पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराची तयारी केली होती. ठिकठिकाणी सभा, बैठका आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले आणि निवडणूक प्रचारावर त्याचा थेट परिणाम झाला. यामुळे अनेक तालुक्यांमध्ये प्रचाराचा सूर मावळला आणि मतदानाच्या टक्केवारीवरही त्याचा परिणाम झाला. 2017 च्या तुलनेत यंदा संपूर्ण जिल्ह्यात सुमारे दोन टक्क्यांनी मतदान घटले आहे.
राष्ट्रवादी काँग््रेाससह सर्वच राजकीय पक्षांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रचार संयमित आणि साध्या पद्धतीने केला. विशेषतः बारामती तालुक्यात कोणत्याही पक्षाकडून मोठ्या जाहीर सभा, भव्य रॅली किंवा आक्रमक प्रचार करण्यात आला नाही. याचा थेट परिणाम मतदानावर झाला असून, बारामती तालुक्यात 2017 च्या तुलनेत यंदा तब्बल 16.45 टक्क्यांनी मतदान घटले आहे. त्यामुळे घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील 73 जिल्हा परिषद गट आणि 146 पंचायत समिती गणांसाठी शनिवारी (ता. 7) मतदान पार पडले. यात एकूण 68.35 टक्के मतदान झाले. राजगड तालुक्यात सर्वाधिक 79.28 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, तर सहा तालुक्यांमध्ये घट झाली आहे. मतदान घटलेल्या तालुक्यांमध्ये बारामती पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल इंदापूरमध्ये 9.07 टक्के, जुन्नरमध्ये 8.49 टक्के, आंबेगावमध्ये 4.97 टक्के, पुरंदरमध्ये 3.19 टक्के आणि मुळशीमध्ये 0.98 टक्के मतदान घटले आहे.
दुसरीकडे, मतदान वाढलेल्या तालुक्यांमध्ये हवेलीमध्ये सर्वाधिक 5.58 टक्के वाढ झाली आहे. तसेच, राजगडमध्ये 3.71 टक्के, मावळमध्ये 3.09 टक्के वाढ झाली असून भोर, खेड, दौंड आणि शिरूर तालुक्यांमध्येही मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. आता घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.