फुरसुंगी: पुणे शहर व समाविष्ट गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी पुणे महापालिकेकडून दरवर्षी टँकरद्वारे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून उघड झालेल्या आकडेवारीनुसार समाविष्ट गावांमध्ये टँकर पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २७ कोटी ७४ लाख ५३ हजार २८८ रुपये खर्च करण्यात आले आहेत.
शहरातील वाढती लोकसंख्या, अपुरी जलवाहिनी व्यवस्था आणि पिण्याच्या पाणीटंचाईमुळे अनेक भागांत टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः फुरसुंगी, उरुळी देवाचीसह होळकरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, उंड्रीसह इतर समाविष्ट गावांमध्ये नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या कालावधीत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. यात समाविष्ट गावांसाठी सुमारे ८ कोटी रुपये, तर उरुळी देवाची व फुरसुंगी परिसरासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एवढा मोठा खर्च करूनही पाणीप्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. टँकरवर कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा कायमस्वरूपी जलयोजना राबविण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेकडे नवीन जलवाहिन्या, पाणीसाठा प्रकल्प आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. पावसाळापूर्वी दीर्घकालीन उपाययोजना न झाल्यास उन्हाळ्यात पुन्हा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.सुभाष घुले, माजी ग्रामपंचायत सदस्य, उंड्री