

पुणे: नगर रस्ता, विश्रांतवाडी आणि पूर्व भागातील प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि ४ मधील लाखो नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिवळसर, गढूळ आणि प्रचंड दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
या समस्येबाबत वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी ढिम्म असून, त्यांच्याकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. नेमके दूषित पाणी का येते याचा अधिकाऱ्यांना अद्याप शोध लागला नाही. तक्रार करण्यास गेल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे.
नगरसेविका नंदिनी धेंडे व माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेत परिसरात येणारे दूषित पाणी दाखवले. धेंडे म्हणाल्या, संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एसआरए परिसर, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी, नगर रस्ता आणि वडगाव शेरी या भागांना भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून या परिसरात पिवळसर रंगाचे तसेच दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. पुढील दोन दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नलिनी आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला. तपासणीत पाणी ओके, तर पिवसळर रंग, दुर्गंधी कशी?
दूषित पाणीपुरवठ्यासंदर्भात
महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्यानंतर पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. तपासणी अहवालानुसार पाणी पिण्यास योग्य असल्याचे सांगण्यात आले असले तरी पाण्याला येणारा पिवळसर रंग आणि दुर्गंधी यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.