निनाद देशमुख
पुणे: शहरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि त्यातून उद्भवणारा सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरात अंदाजे 3 ते साडेतीन लाख भटके श्वान असल्याचा अंदाज आहे. दररोज सरासरी 80 ते 90 जणांना चावण्याच्या घटना नोंदविल्या जात आहेत. शहरातील श्वान आणि नागरिक यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी व ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, पशुवैद्यकीय विभाग आणि प्राणीतज्ज्ञ यांनी एकत्र यावेत, तसेच वर्षभराचा कृती आराखडा तयार करून ही समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना कराव्या असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, या श्वानांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत आहेत. श्वानांचा हा उपद्रव सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेची गंभीर समस्या बनली आहे. सध्या शहरातील अनेक भागांमध्ये श्वानांची टोळकी तयार होत असून, दिवसाढवळ्या नागरिकांवर हल्ले करतात. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक यांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शहराजवळील चाकणसारख्या भागात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या श्वानदंशाच्या घटनांमुळे रेबिज पसरण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.
वाढत्या हल्ल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना बाहेर पडणेही कठीण होत चालले आहे. भटक्या श्वानांची ओळख पटत नाही, त्यांचे लसीकरण झाले की नाही याची खात्री नागरिकांना करता येत नाही. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, उघड्यावर टाकलेले अन्न आणि वाढत्या वसाहती, यामुळे भटक्या श्वानांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या टोळ्या दुचाकीस्वारांवर धावून जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. सकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी मुले आणि रात्री उशिरा घरी परतणारे नागरिक यांच्यावर प्रामुख्याने श्वान हल्ले करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरात उघड्यावर टाकला जाणारा कचरा आणि अनधिकृत फीडिंग पॉइंट्स यामुळे श्वानांची संख्या वाढण्यास हातभार लागत आहे. या फीडिंग पॉइंट्सचे नियमन करणे आवश्यक आहे. पाळीव श्वानांची नोंदणी सक्तीची करणे आणि त्यांचे लसीकरण सुनिश्चित करावे तसेच भटक्या श्वानांची देखील गणना करावी. त्यांचे लसीकरण करून शेल्टरमध्ये हलवावे.संदीप पाटील, प्राणिमित्र, बाणेर
श्वानांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या व खासगी शाळांमध्ये जनजागृती केली जात आहे. 52 शाळांमधील तब्बल 12 हजार 994 मुलांना व 479 शिक्षकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात आहे.डॉ. सारिका फुंदे-भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका
शहरी भागातील ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने भटक्या श्वानांची अधिकृत गणना तत्काळ करावी. मोठ्या प्रमाणावर नसबंदी आणि रेबिज लसीकरण मोहीम राबवावी. लसीकरण झालेल्या श्वानांना स्पष्ट ओळख देण्यात यावी. आक्रमक व धोकादायक श्वानांना तातडीने पकडून वेगळ्या ठिकाणी हलवावे. भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारावी. श्वानांच्या चावल्यास लवकर वैद्यकीय मदत व नुकसानभरपाई द्यावी.ऐश्वर्या पठारे, नगरसेविका
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ कार्यक्रमावर भर देण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नसबंदी आणि रेबिज लसीकरण मोहीम सुरू असून, पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर श्वानांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात भटक्या श्वानांना ठेवण्यासाठी भुगाव, रामवाडी, शिंदेवाडी येथे शेल्टर उभारण्यात येत आहे. येथील दोन शेल्टरची कामे पूर्ण झाली आहे. सध्या येथे पिंजरे बसवले जात आहे. शहरात फिडिंग पॉइंट वाढविण्यासाठी व गाड्या खरेदीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त महापालिका
अश्मयुगापासून मानव आणि श्वान, यांचे सहअस्तित्व राहिले आहे. मानवाचा तो प्रामाणिक मित्र आहे. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढल्याने किंवा काही मानवी चुकांमुळे श्वान आक्रमक होत आहेत. यामुळे लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. हे हल्ले रोखायचे असल्यास त्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. तसेच, प्राण्यांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण मुलांना शालेय जीवनापासून द्यायला हवे. महापालिकेने श्वानांचे निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रियांची संख्या देखील वाढवायला हवी.डॉ. कपिल जयकर, पशुवैद्यकीय तज्ज्ञ