Bangladeshi Women Escape Pudhari
पुणे

Pune Shelter Bangladeshi Women Escape : रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिलांचे पलायन

20 दिवसांनंतरही 10 महिला फरार; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह, कोम्बिंग ऑपरेशनची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वेश्याव्यवसायाच्या नरकातून बाहेर काढून सुरक्षित आश्रय देण्याचा दावा करणाऱ्या महंमदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिलांनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. तब्बल 20 दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाल्याने विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. 23 मार्चच्या रात्री पळून गेलेल्या 12 बांगलादेशी तरुणींपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले. मात्र, 10 महिला अजूनही फरार आहेत. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या कोणाहीविरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

रेस्क्यू फाउंडेशनच्या कायदेशीर रखवालीतून पळालेल्या या सर्व महिला 23 ते 33 वयोगटातील आहेत. शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कुंटणखान्यांतून त्यांची सुटका केली होती. न्यायालयाने 18 मार्च रोजी या महिलांना बांगलादेशात परत पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दूतावासाशी समन्वय सुरू असतानाच रेस्क्यू फाउंडेशनची सुरक्षाव्यवस्था भेदून त्यांनी पलायन केल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था व पोलिस बंदोबस्ताबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

...असे झाले पलायन

एका बांगलादेशी तरुणीने 23 मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता पोटदुखीचे नाटक करीत केअरटेकरला बोलावले आणि तिच्याकडे औषधाची मागणी केली. त्यानंतर औषध घेऊन आलेल्या केअरटेकरवरच तिने झडप घातली. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने केअरटेकरच्या तोंडात बोळा कोंबला व तिचे हातपाय बांधले. नंतर या बांगलादेशी महिलांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप उघडून पळ काढला. या रेस्क्यू फाउंडेशनने सुरक्षेसाठी वारंवार पोलिस संरक्षणाची मागणी केली होती, अशी माहितीही पुढे आली आहे. मात्र, अखेरपर्यंत येथे पुरेसा बंदोबस्त पुरविला गेला नाही. यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

रेस्क्यू फाउंडेशनमध्ये साजरी केली ईद

पलायनाच्या दोनच दिवस आधी (दि. 21) या बांगलादेशी महिलांनी रेस्क्यू फाउंडेशनमध्ये उत्साहात ईद साजरी केली. त्यानंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी आपली सुटका करवून घेतली. त्यांच्या पलायनामुळे रेस्क्यू फाउंडेशन आणि पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर टीका होत आहे. या पलायननाट्यानंतर 20 दिवस उलटून गेले, तरी त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन राबवा

मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरात वाढत्या अवैध बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यावर तातडीने व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहरात तब्बल 50 हजारांपर्यंत बांगलादेशी घुसखोर असल्याचा अंदाजही मिसाळ यांनी वर्तविला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह राज्याच्या पोलिस महानिरीक्षकांना दिलेल्या निवेदनात मिसाळ यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशींचे अवैध स्थलांतर वाढत आहे. निवडणुकांनंतर मोठ्या प्रमाणावर हे नागरिक महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यात येतात. 2023 मधील राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, पुण्यात 5 हजार बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते.

मात्र, मागील तीन वर्षांत केवळ 5 जणांचीच हकालपट्टी करण्यात आली आहे. हे घुसखोर बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्य करीत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे लक्ष्मी रोड, फर्ग्युसन रोडसारख्या गर्दीच्या भागात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. आर्थिक फायद्यासाठी अशा घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही मिसाळ यांनी केली आहे. दरम्यान, शहरातील झोपडपट्‌‍ट्या, बांधकाम साइट्‌‍स आणि दाट वस्त्यांमध्ये तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबविणे, बनावट कागदपत्रांच्या साखळीचा छडा लावण्यासाठी एटीएस आणि एनआयए यांचे संयुक्त पथक नेमण्यात यावे तसेच अटक करण्यात आलेल्या घुसखोरांची त्वरित हद्दपारी करण्याची मागणी मिसाळ यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT