पुणे: महापालिकेने थकीत मिळकत कर वसुलीसाठी गाजावाजा करत अभय योजना राबवली खरी, मात्र प्रत्यक्षात अनेक थकबाकीदारांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेने 15 नोव्हेंबर 2025 ते 15 मार्च 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत ही योजना राबवली.
1070 कोटी 35 लाख रुपयांची वसुली झाल्याचा दावा केला असला, तरी शहरातील लाखो थकबाकीदारांच्या तुलनेत केवळ मोजक्याच थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आकडे वारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही योजना खरंच फायदेशीर ठरली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाने 15 नोव्हेंबर 2025 ते 15 जानेवारीदरम्यान मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत थकीत मिळकत करावरील दंडाच्या रकमेत 75 टक्के सवलत देण्यात आली आहे. मोबाईल टॉवरची थकबाकी वगळता अन्य मिळकतधारकांकडे 12 हजार 161 कोटींची थकबाकी आहे. यात कराची मूळ रक्कम 3 हजार 158 कोटी रुपये असून, त्यावरील दंड 9 हजार 2 कोटी रुपये अशी 12 हजार 161 कोटी रुपये थकबाकी होते. थकबाकीदारांना दंडामध्ये सवलत दिल्यानंतर महापालिकेला मूळ रक्कम आणि दंडाच्या 25 टक्के रकमेसह 5 हजार 408 कोटी रुपये (पान 4 वरून)
1070 कोटी 35 लाखांची वसुली
महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या आकडेवारीनुसार, अभय योजनेचा लाभ घेत 1 लाख 64 हजार 665 मालमत्ताधारकांनी 954 कोटी 78 लाख 64 हजार 127 रुपयांची थकबाकी भरली आहे. तर, 19 हजार 321 मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ न घेता 115 कोटी 57 लाख 10 हजार 838 रुपयांची थकबाकी भरली आहे. या दोन्ही मिळून एकूण 1 लाख 83 हजार 986 मालमत्तांकडून 1070 कोटी 35 लाख 74 हजार 965 रुपयांची वसुली झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेवटच्या दिवशी लाभार्थींकडून 25 कोटी 36 लाख जमा
दरम्यान, योजनेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 15 मार्च रोजी कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्या दिवशीच 2 हजार 728 मालमत्ताधारकांकडून 25 कोटी 87 लाख 21 हजार 637रुपयांची वसुली झाली. त्यापैकी 2 हजार 560 मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ घेत 24 कोटी 36 लाख 14 हजार 796 रुपये भरले, तर 168 मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ न घेता 1 कोटी 51 लाख 6 हजार 841 रुपये जमा केले.