Ajit Pawar Pudhari
पुणे

Ajit Pawar Pune Pattern Politics: ‘पुणे पॅटर्न’ची राजकीय चाल: अजितदादांनी कलमाडींचे वर्चस्व कसे मोडले?

काँग्रेसच्या अभेद्य सत्तेला हादरा देणारा प्रयोग आणि पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी रणनीती

पुढारी वृत्तसेवा

सुनील माळी

पुणे: काँग््रेासच्या विजयाचा वारू पुण्यात चौखूर उधळला होता. महापालिकेवर त्याने 1992 मध्ये चाल करून ती काबीज केली आणि तेव्हापासून पंधरा वर्षे काँग््रेासची जवळपास विनाविरोध सत्ता पुण्याच्या राजकारणावर होती. त्या विजयी वारूचा लगाम होता सुरेश कलमाडी यांच्यासारख्या दिग्गज, वलयांकित नेतृत्वाकडे. मॅन-मनी-मसलपॉवर असलेल्या या धडाकेबाज नेत्याला आव्हान देण्यासाठी तितक्याच जबरदस्त राजकीय धुरंधराची गरज होती आणि या सर्व बाबतींत तितक्याच किंवा त्यापेक्षा काकणभर अधिकच असलेले अजित पवार कलमाडींसमोर शड्डू ठोकून उभे राहिले अन्‌‍ 2007 मध्ये

कलमाडी तसेच काँग््रेासला चक्क सत्ताभष्टही केले...

मुळात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग््रेासची स्थापना 1999 मध्ये केली तेव्हापासूनच राज्यभरातच काँग््रेासच्या वृक्षाची मुळे क्षीण होऊ लागली होती. पुण्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुण्यात महापालिकेच्या 1992 आणि 1997 मधील निवडणुकीत काँग््रेासने मिळवलेल्या चढत्या यशानंतर 2002 मध्ये निवडणूक झाली. त्यात अवघ्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग््रेासने

22 जागा मिळवल्या आणि काँग््रेासच्या यशाला खळे पडायला सुरुवात झाली. महापालिकेत 67 जागा मिळवलेली काँग््रेास त्या निवडणुकीमध्ये 61 पर्यंत घसरली आणि काँग््रेासला सत्तेचा सोपान गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग््रेासच्या म्हणजेच पर्यायाने अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून आधार घ्यावा लागला. आपल्या पक्षाचा पुण्यातला पाया अधिक व्यापक आणि खंबीर करण्यासाठी पुण्यात पक्षसंघटना वाढवणे आवश्यक होते. अजितदादा हे त्या आखाड्यातले कसलेले मल्ल होते. त्यांनी पुण्यातला आपला पाया पक्का केला, त्याचे फळ त्यांना 2007 च्या निवडणुकीत भरघोस मतदानाच्या स्वरूपात मिळाले. राष्ट्रवादी 22 वरून 41 पर्यंत वाढली. काँग््रेासला 36 जागा मिळाल्याने काँग््रेास-राष्ट्रवादी काँग््रेास आघाडीची सत्ता महापालिकेत पुन्हा येण्याचीच शक्यता व्यक्त होऊ लागली होती.

पण, अजितदादांनी धक्कातंत्राचा अवलंब केला. काँग््रेासला आणि त्यापेक्षाही कलमाडी यांना सत्तेवर येऊच द्यायचे नाही, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. त्यामुळे त्यांनी चक्क भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्याशी आघाडी केली आणि नवेच सत्तासमीकरण प्रत्यक्षात उतरवले. राज्यभर तो प्रयोग ‌‘पुणे पॅटर्न‌’ या नावाने गाजला. अजितदादांनी 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादीतून फुटून भाजप-शिवसेनेशी संधान बांधले आणि उपमुख्यमंत्रिपद पटकावले, त्याचा गाजावाजा अजून होतो आहे. पण, या प्रयोगाची सुरुवात त्यांनी पुण्यातल्या ‌‘पुणे पॅटर्न‌’पासून केली होती, याचा अनेकांना विसर पडतो. अर्थात, त्या ‌‘पुणे पॅटर्न‌’मध्ये शरद पवारही सामील होते, तर 2023 मध्ये उपमुख्यमंत्रिपद घेताना अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडली होती, एवढाच फरक होता.

‌‘पुणे पॅटर्न‌’चा प्रयोग 2007 मध्ये करताना अजितदादांनी कलमाडींच्या नेतृत्वाला आव्हान देत त्यांना चितपट केले. तोपर्यंत कलमाडी ते जणूकाही नेतृत्वाचा अमरपट्टा घेऊन आलेले आहेत, अशीच काँग््रेासच्या कार्यकर्त्यांची भावना होती. पुण्याच्या राजकीय वर्तुळात ते ‌‘सब से बडा खिलाडी‌’ होते. अगदी तत्त्वनिष्ठतेने त्यांना विरोध करणारे भाजपसारखे पक्षही हताश झाले होते. विरोधी पक्षीयांचे राजकारणही कलमाडी बदलू शकत असत... पण, राजकारणात बाजू कधी पलटेल, याचा नेम नसतो. ‌‘एकाहून एक चढी जगामधी गर्व कशाचा करू नको...‌’, या अनंत फंदींच्या ‌‘फटक्या‌’प्रमाणे कलमाडींना ‌‘शेरास सव्वाशेर‌’ असे अजितदादा भेटले. सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाला रोखता येते, हे अजितदादांनी दाखवून दिले, पण त्यानंतर दोन-अडीच वर्षांनी त्यांनी कलमाडी आणि काँग््रेासची साथ पुन्हा घेत सत्ता मिळवली. काँग््रेास पुन्हा सत्तेवर आली तरी राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला. राष्ट्रवादीच्या या वरचष्म्यावर 2012 च्या निवडणुकीत शिक्कामोर्तब झाले, याचे कारण म्हणजे त्या निवडणुकीपर्यंत जागांबाबत छोटा भाऊ असलेला राष्ट्रवादी काँग््रेास 51 जागा मिळवत मोठा भाऊ ठरला आणि 36 जागांपर्यंत घसरलेल्या काँग््रेासला लहान भावाची भूमिका करावी लागली. पुढे 2017 मध्ये नरेंद्र मोदी लाटेत काँग््रेास पुण्यात नेस्तनाबूत होत दहा जागांपर्यंत घसरत असतानाच राष्ट्रवादी काँग््रेास 51 वरून फक्त 41 पर्यंतच कमी झाली. त्या पक्षाचा पुण्यातील पाया थोडा हलला असला तरी पक्षाचे अस्तित्व लक्षणीयरीत्या कायम राहिले. त्यात अजितदादांचा वाटा सिंहाचा होता.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने 165 पैकी 119 जागा मिळवून निर्विवाद बहुमत प्राप्त केले, तेव्हा मात्र राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष कमी पडला हे खरे, पण त्या पराभवाला केवळ अजितदादांच्या नेतृत्वातील कमीपणाच कारणीभूत नव्हता, तर इतरही अनेक बाबी कारणीभूत होत्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासचे मनोमिलन खरेच झाले होते का? झाले असेल तर दुसरी राष्ट्रवादी काँग््रेास प्रकर्षाने प्रचारात का दिसली नाही? आदी अनेक प्रश्न त्यांना विचारायचे मनात होते. आता त्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत, पण हा पराभवही खिलाडूपणाने अजितदादांनी स्वीकारला होता. दादा, तुमच्या जाण्याने प्रशासनावर पकड असणारा, वेगवान निर्णय करण्यात आणि तितक्याच वेगात त्याची अंमलबजावणी करणारा तसेच कोणाला काय वाटेल त्याची पर्वा न करता रोखठोक मते व्यक्त करणारा नेता राज्याने गमावला आहे आहेच, पण लोंबकळणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आता असा तडफदार नेता कुठे मिळणार, हा आम्हा पुणेकरांच्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT