पुणे: पुणेकरांना सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच आपल्या यंत्रणेच्या मर्यादा अधिकृतपणे मान्य केल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाणी अत्यंत गढूळ झाले असून, ते पूर्णपणे शुद्ध करणे सध्याच्या यंत्रणेला शक्य होत नसल्याची कबुली महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे. शहराच्या विविध भागांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्यात तुरटी फिरवावी, तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पुण्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पाण्यात माती देखील वाहून आल्याने अनेक पाण्याचे स्रोत गढूळ झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पातून हे पाणी शुद्धीकरण प्रकल्पात येऊनही ते शुद्ध होत नसल्याने पाणी उकळून तसेच पाण्यात तुरटी फिरवून पाणी प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. गंभीर बाब म्हणजे सिंहगड रस्त्यालगतच्या हद्दवाढ झालेल्या गावांमध्ये अद्याप जलशुद्धीकरणासाठी फिल्टर प्लांटच उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांना केवळ निर्जंतुकीकरण केलेले नदीचे गढूळ पाणी पुरवले जात असल्याचेही महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट झाले आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता अपुरी
धरणांमधून येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळपणात (टर्बिडिटी) मोठी वाढ झाली आहे. विशेषतः शहरातील प्रमुख 'जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र' येथे येणाऱ्या पाण्याची गढूळता प्रकल्पाच्या निर्धारित शुद्धीकरण क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ते पूर्णपणे शुद्ध करणे शक्य होत नसल्याचे महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असतानाही ऐन पावसाळ्यातच यंत्रणा अपुरी पडत असल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे.
नागरिकांवरच खबरदारीची जबाबदारी
पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवण्याचा, त्यात तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू देण्याचा, त्यानंतर कापडाने गाळून पाणी उकळूनच वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असताना नागरिकांनाच अशा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढलेला असताना गढूळ पाणीपुरवठ्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात अनेक भागांत दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी थेट पाणी उकळून प्यावे, तसेच पाण्यात तुरटी फिरवून पाणी प्यावे. पिण्याच्या पाण्यात कोणतेही रोगजनक जीवाणू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक ती खबरदारी पाणीपुरवठा विभागामार्फत घेतली जात आहे.नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका