पुणेकरांचा हुंकार! आजपासून 'पुढारी'च्या व्यासपीठावर Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation election: पुणेकरांचा हुंकार! आजपासून 'पुढारी'च्या व्यासपीठावर

नगरपालिकेपासून महापालिकेपर्यंतचा 75 वर्षांचा राजकीय प्रवास; काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या उदयास्ताची कहाणी आणि नव्या प्रभागरचनेतील खडाखडीचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

नमस्कार, पुणेकर जनहो...

पुणे महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या पंचाहत्तर वर्षांत एकूण तेरा निवडणुका होऊन आता आपण चौदाव्या निवडणुकीच्या तोंडावर उभे आहोत... नव्या प्रभागरचनेमुळे प्रत्येक ठिकाणी राजकीय खडाखडी कशी होते आहे, हे पाहणे औचित्यपूर्ण ठरणार आहे. तसेच, नागरी सुविधा पुरविण्यात नगरसेवक-प्रशासन किती यशस्वी झाले आणि कुठे अयशस्वी झाले, कुठेकुठे कामचुकारपणा झाला, या प्रश्नांची उत्तरे थेट पुणेकरांकडून मिळविणेही योग्य ठरेल. त्यामुळेच राजकीय ‌‘खडाखडी‌’ अन्‌‍ ‌‘लोकजागर‌’ हा पुणेकरांचा लेखाजोखा ‌‘पुढारी‌’च्या ‌’रणसंग््रााम महापालिकेचा...‌’ या व्यासपीठावर आजपासून प्रकटणार आहे. त्याचबरोबर पंचाहत्तर वर्षांच्या प्रदीर्घ काळातील निवडणुकांमधील रोचक-रंजक बाबीही ‌‘निवडणूक... कालची, आजची‌’मधून आपल्यासमोर येतील. कोणत्या पक्षाकडे सत्ता सोपवायची? याचा निर्णय मतदारांना करता यावा, हा या साऱ्या मांडणीमागचा उद्देश आहे.

- निवासी संपादक

पुण्यात नगरपालिकेची स्थापना 1857 मध्ये झाली आणि त्यानंतर 93 वर्षांनी म्हणजे 1950 मध्ये तिचे महापालिकेत रूपांतर झाले. नगरपालिका स्थापन झाली तेव्हा बिटीश सत्तेने नुकताच स्वातंत्र्याचा उठाव अयशस्वी केला होता आणि देशात आपला जम बसवला होता. पारतंत्र्याच्या काळातही पुण्यातील नागरी समस्यांबाबत विचारमंथन सुरू होते. त्या काळातही काही रंजक राजकीय घडामोडी होत होत्या. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच तीनच वर्षांत महापालिका अस्तित्वात आली. महापालिकेची पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली.(Latest Pune News)

त्यानंतर 1957, 1962, 1968, 1974, 1979, 1985, 1992, 1997, 2002, 2007, 2012 आणि 2017 अशा तेरा निवडणुका पुण्यात झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांत कोणकोणत्या राजकीय पक्ष-संघटनांचे प्राबल्य होते, पुणेकरांचा तेव्हा कल काय होता, कोणकोणत्या समस्या पुढे आल्या, त्यांना उत्तरे कशी शोधली गेली, विकासकामे कसकशी होत गेली, नंतरच्या काळात काँग्रेस सर्वशक्तिमान कशी बनली, तिला उतरण कधी आणि का लागली, भारतीय जनता पक्षाचा उदय कसा झाला आणि त्याची चढती कमान कशी होत गेली... या प्रश्नांची उत्तरे निश्चितच रंजक ठरतात. पुण्यातील राजकीय लंबक कसा हलत गेला, याचे उत्तर शोधताना ढोबळमानाने तीन टप्प्यांत त्याची विभागणी करता येते. पहिला टप्पा 1952 ते 1992.

दुसरा टप्पा 1992 ते 2017 आणि तिसरा टप्पा 2017 नंतरचा काळ. पहिल्या टप्प्याच्या म्हणजे 1952 ते 1992 या काळात देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व असले, तरी आणि पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे महापालिकेत-स्थानिक राजकारणात काँग्रेस ही महत्त्वाची शक्ती असली, तरी तिचा एकतर्फी प्रभाव नव्हता. या कालखंडातील मोठा काळ नागरी संघटनेचे पुण्याच्या महापालिकेत वर्चस्व होते, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती, जनता पक्षाच्या स्थापनेनंतर जनता पक्षासह एकत्रित विरोधक यांनीही काही काळ आपले प्राबल्य दाखविले.

पुण्याच्या स्थानिक राजकारणातील दुसरा 1992 ते 2017 पर्यंतचा काळ हा बहुतांश काँग्रेस तसेच त्याच पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस या नावाने फुटलेला भाग यांच्या वर्चस्वाचा होता. या काळात काँग्रेस ही पुण्यातली सर्वांत प्रभावी राजकीय शक्ती ठरत होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचे भाजप-शिवसेना आपले अस्तित्व टिकवून होते, तरी सर्वांत बलशाली ठरली ती काँग्रेस.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1999 मधील स्थापनेनंतर एकसंध काँग्रेसचे प्राबल्य संपुष्टात आले, तरी तिच्या दोन तुकड्यांनी पुण्याची राजकीय सत्ता हाती ठेवली. पुण्यातल्या स्थानिक राजकारणाचा तिसरा टप्पा होता तो भाजप ही प्रबल शक्ती बनण्याचा म्हणजेच 2017 पासूनचा. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शानदाररीत्या सत्ता हस्तगत केली आणि त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांची गणिते बदलून गेली. अगदी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत आणि विधानसभेपासून ते पुणे महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत. देशात 2014 मध्ये लोकसभेबरोबरच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीने मुंबईची राजसत्ता भाजपने हिसकावून घेतली आणि त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत त्या पक्षाने स्पष्ट बहुमत घेत इतिहास घडविला.

या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष चौदाव्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. भाजपसमोर कोणी एक समर्थ विरोधी पक्ष उभा असल्याचे चित्र सध्यातरी दिसत नाही. पुण्यामध्ये गेल्या काही निवडणुकांत भाजपशी जबरदस्त टक्कर घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही आता दोन छकले उडाली आहेत. त्यातही त्यातला मोठा म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष राज्यात भाजपबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतो आहे. स्थानिक पातळीवर या दोन पक्षांत युती होण्याची शक्यता अंधुक दिसत असली तरी एकमेकांवर कडवेपणाने तुटून पडण्याची वृत्ती दोन्ही पक्षांत राहणार नाही, एवढे मात्र निश्चित. एकेकाळी राज्याबरोबरच महापालिकेवर राज्य केलेल्या काँग्रेसची तर अस्तित्वाची लढाई आहे. या पक्षाने गेल्या निवडणुकीत अवघ्या 11 जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर आत्तापर्यंत त्या पक्षाकडून भाजपकडे जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी होत चालली आहे. भाजपला रोखण्यासाठी या पक्षाला खूप मोठा लढा द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची खेळी कोणती असेल, यावर पुण्यातील स्थानिक राजकारणाची दिशा अवलंबून असेल.

प्रमुख पक्षांची गेल्या काही निवडणुकांतील कामगिरी

भाजप

1992 - 24

1997 - 20

2002 - 33

2007 - 25

2012 - 26

2017 - 98

त्यानंतर 11 गावांचे दोन वॉर्ड. त्यापैकी 1 ने वाढ. 99 झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस

2002 - 22

2007 - 41

2012 - 51

2017 - 41 त्यानंतर 11 गावांचे दोनवॉर्ड. त्यापैकी 1 ने वाढ. 42 झाले.

काँग्रेस

1992 - 52

1997 - 67

2002 - 61

2007 - 36

2012 - 28

2017 - 11

मनसे

2007 - 8

2012 - 28

2017 - 2

निवडणूक... कालची, आजची

महापालिकेच्या स्थापनेनंतर आत्तापर्यंतची राजकीय, नागरी स्थिती खूप बदलली. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून पुण्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. वेगवेगळ्या संघटना पुढे आल्या आणि कालांतराने त्या नष्ट झाल्या. अनेक राष्ट्रीय-प्रादेशिक राजकीय पक्षांचे चढउतारही या पुण्याने पाहिले. हे स्थित्यंतर पाहणे रंजक ठरते, तसेच या काळातील सामाजिक स्थिती कशी होती, कोणकोणत्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा संपर्क महापालिकेशी येत गेला, पुण्याच्या विकासात त्यांचे योगदान काय राहिले आदी अनेक प्रश्नांची उत्तरे या सदरात शोधली जातील तसेच या काळातील तेरा निवडणुकांत घडलेल्या बऱ्याच रोमहर्षक प्रसंगांचीही नोंद त्यात असेल.

लोकजागरपुण्यात गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी नागरिकांसाठी कोणती कामे केली? त्यांनी दिलेली कोणती आश्वासने दिवाळीतल्या फुसक्या फटाक्यांप्रमाणे ठरली? पुण्याच्या मूलभूत विकासाच्या पाणी-वाहतूक-कचरा आदी पायाभूत सुविधांबाबत ठोस पावले उचलली गेली का? प्रशासकीय कारभाराच्या गेल्या अडीच वर्षांच्या काळात नागरीहिताकडे कितपत लक्ष दिले गेले? या सर्वांचा नागरिकांच्या तोंडातून आलेला लेखाजोखा म्हणजे ‌‘लोकजागर‌’. ‌‘पुढारी‌’च्या व्यासपीठावर राजकीय खडाखडीच्या चित्रणाबरोबरच नागरिकांचा हा हुंकार आजपासून उमटणार आहे. या उत्तरावरच कोणाकडे सत्ता सोपवायची, याचा निर्णय मतदारांना करता येईल.

खडाखडी

नव्या प्रभागरचनेमुळे खडाखडीच्या प्राथमिक टप्प्यात प्रत्येक प्रभागातील गेल्या वेळी निवडून गेलेले नगरसेवक कुठल्या जागेवरून लढायला उत्सुक आहेत, तसेच नव्या इच्छुकांच्या कोणकोणत्या हालचाली सुरू आहेत, या प्रश्नांचा आढावा यानिमित्ताने घेणे यथोचित ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT