Water Pudhari
पुणे

Pune Water Problem: महर्षिनगरमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; वेळापत्रक विस्कळीत, नागरिक हैराण

नियोजनशून्य पाणीपुरवठ्यामुळे चाळ व वसाहतींमध्ये पाणीच न पोहोचल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे

पुढारी वृत्तसेवा

महर्षिनगर: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे पाणीकपातीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महर्षिनगर परिसरातील चाळी, तसेच मीनाताई ठाकरे वसाहतीतील नागरिकांना सध्या पाण्याविना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.

परिसरात प्रशासनाच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत असला, तरी अनेक चाळी आणि वसाहतींमध्ये उशिरापर्यंत पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी रात्री उशिरा पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत स्वारगेट पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधल्याने ‘तांत्रिक अडचण’ असल्याचे कारण दिले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच, ठरलेल्या वेळेत पाणी येत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. संतप्त नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार देत असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत आहेत.

बिबवेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत तांत्रिक अडचणीमुळे अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

प्रशासनावर नागरिकांची तीव्र नाराजी

‘स्वारगेट पाणीपुरवठा विभाग या परिस्थितीस पूर्णपणे जबाबदार असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांशी खेळत आहे,’ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. महिलांनीही पाणीटंचाईमुळे होणाऱ्या त्रासाबाबत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

गेल्या १५ जूनपासून पाणीकपात सुरू झाली आहे; मात्र वस्ती भागात पाणी येण्याची निश्चित वेळ नाही. रात्री किंवा पहाटे पाणी सोडले जात असल्याने दिवसभर काम करून घरी आल्यानंतर पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागत आहे. एवढे करूनही काही भागांत पाणी येते, तर काही भागांत येत नाही.
सागर निंबाळकर, रहिवासी, मीनाताई ठाकरे वसाहत
महर्षिनगर परिसरातील चाळ क्रमांक ८० आणि ८१ मधील रहिवाशांना पाणीच मिळत नाही. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही प्रश्न सुटलेला नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आश्वासने देण्याव्यतिरिक्त काही करीत नाही.
विजया खटावकर, रहिवासी, महर्षिनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT