पुणे: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. 15) लागणार आहे. या निकालातून पुणेकरांनी कारभारी म्हणून नक्की कोणाला कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे. भाजप पुन्हा एकहाती सत्ता मिळविणार की राष्ट्रवादी काँग््रेास भाजपची सुरू असलेली घोडदौड रोखणार, याची पुणेकरांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जवळपास 54 टक्के मतदान झाले असून, गत महापालिका निवडणुकीत (2017) मतदानाची टक्केवारी जवळपास एवढीच होती. मात्र, या वेळेस तब्बल 19 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2017 च्या 14 लाख मतदारांच्या तुलनेत तब्बल साडेचार ते पाच लाख नवमतदारांनी या वेळेस मतदान केले असल्याने निवडणुकीच्या निकालात या नवमतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांतील 163 जागांसाठी 35 लाख मतदारांपैकी जवळपास 54 टक्के मतदारांनी गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीच्या टक्केवारीची वैशिष्ट्ये म्हणजे नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत 54.84 टक्के इतके मतदान झाले होते. आता या वेळेसही सरासरी टक्केवारी जवळपास तेवढीच आहे. मात्र, 2017 च्या वाढलेल्या टक्केवारीने भाजपला फार मोठे यश मिळवून दिले होते. आता पुन्हा मतदानाची टक्केवारी असून, यात मतदारांची वाढलेली संख्या निर्णायक अशी आहे. गत महापालिका निवडणुकीत जवळपास 14 लाख मतदारांनी मतदान केले होते. मात्र, आता नऊ वर्षांत मतदारांची संख्या वाढली असून, तब्बल 19 लाख मतदारांनी मतदान केले आहे. म्हणजेच या निवडणुकीत जवळपास 5 लाख मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केले आहे. या नवमतदारांनी पहिल्यांदाच कोणाच्या पारड्यात मते टाकली यावरच पुण्याचा कारभारी कोण हे ठरणार आहे. साधारणपणे आतापर्यंत नवमतदार हा भाजपबरोबर जात असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात या नवमतदारांनी भाजपला साथ दिल्यास पुण्यात भाजपला मोठे यश मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मग परिवर्तन होणार का ?
साधारणपणे मतदानाचा टक्का वाढला की प्रस्थापितांना धक्का असे मानले जाते. या निवडणुकीत मतदानाचा टक्का 2017 एवढाच कायम आहे. मात्र, आता टक्केवारी गतवेळेप्रमाणे कायम असली तर मतदारांची वाढलेली संख्या परिवर्तन घडवणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांतील 165 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने दोन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित 165 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. तब्बल 1 हजार 153 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, निवडणुकीचा मुख्य सामना हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास या दोन पक्षातच रंगला. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासूनच भाजपने 120 ते 125 जागा जिंकण्याची डरकाळी फोडून विरोधकांची हवा काढली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मैदानात उतरून भाजपला लक्ष्य करीत जो आक्रमक पद्धतीने प्रचार केला, त्यामुळे या निवडणुकीतील वातावरण तापले होते. सरतेशेवटी भाजपने एकहाती सत्ता मिळविणार, असा दावा कायम ठेवत आम्हाला कोणाच्याच मदतीची गरज भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर राष्ट्रवादी काँग््रेासकडून आमचाच महापौर होणार असा दावा केला जात आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांच्या लढतीत दोन्ही शिवसेना, काँग््रेास, मनसे, आप आणि अपक्ष किती जागा जिंकणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, 41 पैकी काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे नक्की कोण वरचढ ठरणार, भाजप एकहाती सत्तेत येणार की, सत्तेची चावी शिवसेना अथवा राष्ट्रवादीच्या हातात जाणार याची उत्सुकता आहे. शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत आणि पुणे महापालिकेचा कारभारी कोण यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपसाठी मोठे आव्हान
भाजपने 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 98 जागा जिंकल्या होत्या, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग््रेास 41, काँग््रेास 10, शिवसेना 10, मनसे दोन आणि एमआयएम एक असे संख्याबळ होते. त्यानंतर समाविष्ट 11 गावांच्या समावेशानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग््रेासने प्रत्येकी 1 जागा जिंकली होती. दरम्यान, आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग््रेास व शिवसेनेच्या 2017 मध्ये निवडून आलेल्या जवळपास 12 ते 15 माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन सर्वच विरोधकांना चेकमेट केले होते. त्या जोरावरच भाजपने 120 ते 125 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किमान 100पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे आव्हान भाजपपुढे आहे, तर दुसरीकडे आक्रमक प्रचार करून भाजपला जेरीस आणणाऱ्या अजित पवारांना किमान 50 जागा तर जिंकून दाखव्याव्या लागतील तरच राष्ट्रवादीचा शहरातील राजकारणात दबदबा टिकून राहणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत उत्सुकतेचा असा असणार आहे.
नाव न दिसल्याने वादावादी...
शहरातील बहुतांश केंद्रांवर गुरुवारी मतदार मोठ्या उत्साहाने पोहोचले. मात्र, मतदारांची नावे एका प्रभागातून लांबच्या प्रभागात गेलेली दिसली. त्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला. काहींनी तर मतदानच न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले.
पोलिस, अधिकारी अन् मतदार...
अनेक केंद्रावर पोलिसांना मतदानाच्या ठिकाणी वारंवार हस्तक्षेप करावा लागला. पर्वती प्रभागातील वीणकर सभागृहात सकाळी 8 ते 9 या वेळेत पोलिस, सरकारी अधिकारी अन् मतदार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अखेर उमेदवारांच्या वतीने स्टॉल लावून छोट्या टेबल टॉप मशीनमधून व्होटींग चिट काढून देण्यात आल्याने बहुतांश केंद्रावरचे सकाळच्या सत्रातले वाद काही अंशी कमी झाले होते.
मी दोन्ही ठिकाणांहून निवडून येणार...
घोरपडे पेठ प्रभागात दुपारच्या मतदारांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक उमेदवार मतदान केंद्रापासून दूरवर उभा राहून मतदारांना अभिवादन करत होता. या भागातील एक उमेदवार दोन ठिकाणांहून मैदानात उतरला आहे. त्याची विजयी थाटातच पदयात्रा निघाली होती. ते म्हणत होते, मी दोन्ही ठिकाणांहून निवडून येणार आहे.