पुणे: शहरात एलपीजी गॅसच्या तीव टंचाईमुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांचा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. सिलिंडरअभावी खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना आपले स्टॉल तात्पुरते बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे कमी पैशात झटपट मिळणाऱ्या खाद्यपदार्थांना ग््रााहक मुकत आहे. नेहमी संध्याकाळच्या वेळेस गजबजणारे फूड स्टॉल्स, चहा-नाष्ट्याचे गाडे आणि छोटे हॉटेल सध्या ओस पडलेले दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे फेरीवाल्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक विक्रेत्यांकडे पर्यायी इंधनाची कोणतीही सोय नसल्याने त्यांना व्यवसाय थांबविणे भाग पडले आहे.
काही विक्रेत्यांनी महागड्या दराने सिलिंडर खरेदी करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र वाढत्या खर्चामुळे नफा कमी होत असल्याने हा पर्यायही टिकाऊ नसल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि प्रमुख रस्त्यांवरील खाद्य स्टॉलमध्ये ग््रााहकांची वर्दळ लक्षणीयरीत्या घटली आहे. अनेकांना आता महागड्या हॉटेलकडे वळावे लागत असून, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होत आहे.
दरम्यान, काही विक्रेत्यांनी लाकूड किंवा कोळशासारख्या पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यासाठी लागणारी जागा, वेळ आणि अतिरिक्त खर्चामुळे तो उपाय व्यवहार्य ठरत नाही. तसेच, धूर आणि प्रदूषणाच्या कारणास्तव प्रशासनाकडूनही अशा पद्धतींवर निर्बंध आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गॅसपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. फेरीवाल्यांनीही लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा, गॅसटंचाईचे संकट अधिक काळ टिकल्यास छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.