Kondhwa Road Blocked Pudhari
पुणे

Pune Kondhwa Road Blocked: कोंढवा खुर्दमध्ये तयार रस्ता ‘नेत्याच्या नातेवाइकामुळे’ बंद; नागरिकांना 4-5 किमी वळसा

महापालिकेचा रस्ता पूर्ण तरीही बंदच; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोंढवा खुर्द परिसरात महापालिकेने केलेला रस्ता महायुतीमधील एका बड्या नेत्याच्या नातेवाइकामुळे अडविला गेला आहे. त्यामुळे रस्ता तयार होऊनही नागरिकांना तब्बल चार ते पाच किमीचा वळसा घालून यावे लागत आहे. त्याचा ताण कोंढवा खुर्द आणि एनआयबीएम रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडीच्या प्रचंड त्रासाला या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नेत्याच्या नातेवाइकाच्या दहशतीमुळे महापालिकेकडून मात्र रस्ता सुरू करण्याचे धाडस दाखविले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोंढवा खुर्द येथे सर्व्हे. नं. 33 (पै.) 36 (पै.) मधून महापालिकेचा विकास आराखड्यातील 15 मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता एनआयबीएम रस्त्यालगत असलेल्या क्लोवर पिनॅकल रिज या सोसायटीच्या आवारातून जातो. हा डांबरी रस्ता महापालिकेने पूर्णपणे विकसित केला असून, सोसायटीचा पुढील रस्ता खासगी सहभागातून (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे एनआयबी रस्त्यावरून कात्रज, खडी मशिनकडे जाणाऱ्या वाहनांना थेट पारगेनगरमार्गे ये-जा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सध्या कोंढव्याकडून खडी मशिनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ज्योती चौकातील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सुटणार असून, नागरिकांचा तब्बल चार ते पाच किमी अधिकचा वळसा वाचणार आहे.

विशेष म्हणजे, या भागातील हा एकमेव रस्ता आहे. तो आता जवळपास पूर्णपणे तयार झाला आहे. मात्र, क्लोवर पिनॅकल रिज या सोसायटीत महायुतीतील एका बड्या नेत्याचे नातेवाईक राहण्यास होते. त्यांनी सोसायटीच्या आवारातून जाणाऱ्या रस्त्याची भिंत काढण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हा रस्ता बंद आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेचे पथक ही भिंत काढण्यासाठी गेले असता या मंत्र्याच्या नातेवाइकाने थेट महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकाविले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाला सीमाभिंत न काढताच रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे रस्ता तयार होऊन या मंत्र्याच्या नातेवाइकाच्या दहशतीमुळे तो सुरू करता येत नाही. त्याचा फटका या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत दाद नक्की कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अजित पवारांचे निधन अन्‌‍ सीमाभिंतीचे बांधकाम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला अपघाती निधन झाले. या दिवशी अवघा महाराष्ट्र शोकमग्न असतानाच त्याच दिवशी सोसायटीने रस्ता अडविणारी सीमाभिंत रातोरात बांधली असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री अडकले होते वाहतूक कोंडीत

कात्रज व कोंढव्याकडून एनआयबीएमकडे जाण्यासाठी ज्योती चौकातून जावे लागते. त्यामुळे या चौकात सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी असते. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या वाहतूक कोंडीत अडकण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे नातेवाइकामुळे अडलेला रस्ता सुरू झाल्यास या भागातील वाहतूक कोंडी सुटू शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT