

पुणे: पश्चिम महाराष्ट्रात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. असे असले तरी पुणे विभागातील कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्हे वगळता पुणे आणि सातारा जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील 16 तालुक्यांमधील साडेसात हजारांहून अधिक नागरिकांसमोर पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीव होत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तातडीने खासगी, सरकारी 13 बोअरवेल्स आरक्षित करून 16 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील माण, वाई, पाटण, खंडाळा, कराड आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात डोके वर काढत आहे. माण तालुक्यातील दोन गावे आणि 19 वाड्यांवरील 3 हजार 251, वाई तालुक्यातील तीन वाड्यांसह चार गावांतील 3 हजार 659 आणि पाटण तालुक्यातील दोन वाड्यांमधील 592 नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: वणवण करावी लागत आहे. नागरिकांबरोबर पशुधनालाही पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. वाई आणि पाटण तालुक्यातील अनुक्रमे एक हजार 495 आणि 295 असे एकूण एकहजार 790 पशुधन बाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली. प्रशासनाने आरक्षित केलेल्या खासगी आणि सरकारी टँकरवर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.