पुणे: जांभूळ शब्द उच्चारला की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या या फळाला सध्या लहरी हवामानाचा फटका बसत आहे.
गेल्या काही दिवसांत उन्हाची तीवता वाढल्याने झाडांवरची जांभळे पिकण्याआधीच गळू लागली आहेत. परिणामी, बाजारात येणारी आवक थेट निम्म्यावर आली आहे. तसेच, उष्णतेच्या दर्जावरही परिणाम झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरही दहा ते वीस टक्क्यांनी कमी मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे.
कोकणच्या विविध भागांतून ही जांभळे गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल होत आहेत. एरवी 40 ते 50 डागांची रेलचेल असते तिथे आता केवळ 15 ते 20 डागांवरच समाधान मानावे लागत आहे. उन्हाच्या झळांनी जांभळांचा ताजेपणा हरवत चालला आहे. चकचकीत, टवटवीत दिसणाऱ्या जांभळांची जागा आता थोडीशी कोमेजलेल्या फळांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या दर्जावर परिणाम होऊन दरही घसरले आहेत.
बाजारात 13 ते 15 किलोच्या एका डागाला 1500 ते 2400 रुपये भाव मिळत आहे. पण, हा दरही नेहमीपेक्षा दहा ते वीस टक्क्यांनी कमीच आहे. ऐन हंगामाच्या बहरात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जांभूळप्रेमींची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. दरम्यान, येत्या वीस दिवसांत गुजरात, कर्नाटक, आंध प्रदेश तसेच स्थानिक भागातून टप्प्याटप्प्याने आवक सुरू होईल. त्यानंतर दर खाली येण्याची शक्यता व्यापारीवर्गातून व्यक्त करण्यात आली.
उन्हाची तीवता खूप वाढल्याने जांभळांवर मोठा परिणाम झाला आहे. झाडांवरची फळे गळत असल्यामुळे बाजारात येणारी आवक जवळपास निम्म्यावर आली आहे. जे जांभूळ बाजारात येत आहे, त्याच्या दर्जावरही उष्णतेचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे दर मिळत असले, तरी ते अपेक्षेपेक्षा कमीच आहेत. एखादा पाऊस झाला, तर जांभळांची गुणवत्ता सुधारेल आणि आवकही वाढेल, अशी अपेक्षा आहे.सागर भोसले, जांभूळ व्यापारी, मार्केट यार्ड