पुणे: जिल्ह्यातील गावोगावी अवैध हातभट्टी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक गावांत वारंवार कारवाई करूनही स्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण आहे. यातूनच जिल्हाभर हातभट्टी दारूचा व्यवसाय फोफावल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड येथे विषारी दारूचे सेवन केल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर जिल्ह्यातील हातभट्टी दारूचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नदी, ओढ्यांच्या काठावर तसेच दाट झाडीच्या परिसरात असंख्य दारू तयार करण्याच्या भट्ट्या रात्रंदिवस सुरू असतात. ही दारू गावोगावी असलेल्या अवैध गुत्त्यांवरून ग््रााहकांना पुरवली जाते. मात्र, यातील घातक घटकांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील घटनेनंतर आता अशा दारू भट्ट्यांवर कारवाईचा फार्स पोलिसांकडून केला जात आहे.
कारवाईचे नेमके ‘गौडबंगाल’ काय?
अवैध दारूअड्यांवर संबंधित पोलिस ठाण्यासह महसूल आणि उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धाडी टाकून ते उद्ध्वस्त केले जातात. कारवाईदरम्यान हजारो रुपयांचे दारूनिर्मितीचे रसायन ओतून दिले जाते. मात्र, आश्चर्य म्हणजे वारंवार कारवाई करूनही अवघ्या काही दिवसांत त्याच ठिकाणी पुन्हा भट्ट्या पेटल्याचे दिसून येते. यामुळे प्रशासनाच्या या कारवाईचे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पर्यटनस्थळे, महामार्ग बनले ’अड्डे’
जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळांच्या परिसरात अवैध दारूची सर्रासपणे विक्री केली जाते. महामार्गावरील ढाबे, हॉटेल्ससह गावांतील काही हॉटेलांमध्येही गावठी दारू सहजपणे उपलब्ध होते. याकडे मात्र प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी जिल्ह्यात अवैध दारूविक्रीसह गांजा आणि ड्रग्जविक्रीचेही जाळे पसरल्याचे बोलले जाते.
तरुण पिढी देशोधडीला; मोहिमेची गरज
या अवैध धंद्यांमुळे मद्यपींच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून तरुण वर्ग देशोधडीला लागल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी पोलिसांनी केवळ नावापुरती कारवाई न करता, अत्यंत सतर्क राहून अवैध धंद्यांविरोधात कायमस्वरूपी आणि कडक मोहीम सुरू ठेवणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कठोर कारवाईची नागरिकांना अपेक्षा
पुणे जिल्ह्यातील विषारी दारूकांडाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील हातभट्टी व्यवसाय, त्यामागील साखळी, पुरवठा यंत्रणा आणि संभाव्य संरक्षण यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा प्रत्येक दुर्घटनेनंतर धाडी, चौकशा आणि आश्वासनांचेच चक्र सुरू राहील; मात्र अवैध दारूचा व्यवसाय कायम राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पुरंदरमधील हातभट्ट्यांवर कारवाई करणार का?
फुगेवाडी आणि हडपसर परिसरात विषारी दारूप्राशनामुळे 17 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारूविरोधी कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात आजही हातभट्टीच्या दारूचे उत्पादन आणि विक्री राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप होत आहे. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनोरी, कोडीत, दिवे, वनपुरी, चांबळी, आंबोडी, सोमुर्डी तसेच गराडे परिसरात हातभट्टीच्या दारूचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.
दौंड तालुक्यात हातभट्ट्यांचा सुळसुळाट
दौंड परिसरात अवैध दारूचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील गोवा गल्ली, गिरीम परिसर आणि दौंडच्या पूर्व भागात हातभट्टी दारू तयार केली जाते.भीमा नदीपलीकडून पहाटे दारूची वाहतूक शहरात केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यात दारूबंदी कागदावरच
नारायणगाव येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीर दारू व्यावसायिकांचा सुळसुळाट झाला आहे. दारूबंदी कायदा अस्तित्वात असतानाही खुलेआम चालणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे ग््राामीण भागातील सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावोगावी दारू सहज उपलब्ध होत असल्याने मद्यपींचे प्रमाण वाढले आहे.