पुणे: ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकांवर मर्यादा आणि कालानुरूप निर्बंध लादल्यानंतरच मंडळांमध्ये आवाजाची स्पर्धा निर्माण झाली, आणि कर्णकर्कश डीजेचा श्रीगणेशा झाला, अशा आठवणी पुण्यातील गणेश मंडळांतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगत गणेशोत्सवात आलेल्या स्थित्यंतराबाबत माहिती दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव हा प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याने मेळ्यांमधून गाणी, नृत्य, नाट्य आणि रूपकांच्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश पोहोचविला जात असे. पुढे रेडिओ, भोंगे, टेपरेकॉर्डर, कॅसेट, सीडी आणि आधुनिक ध्वनियंत्रणा असे बदल होत गेले. मात्र, २००७ मध्ये राज्य सरकारने रात्री १० नंतर स्पीकर बंद करण्याबाबत सांगितले, तेव्हाच आवाजाची मर्यादा वाढली, असे आनंद सराफ यांनी नमूद केले.
तर, शहरांचे विस्तारीकरण, माळीच्या गणपती मंडळांची वाढती संख्या त्यामुळे ढोल-लेझीम, लाठी-काठी आणि आखाड्यांची परंपरा कमी होत गेली; आणि त्याच वेळी मिरवणुकीत सहज उपलब्ध असलेला स्पीकर हा पर्याय बनला. १९९०च्या दशकापासून स्पीकरचा वापर वाढत गेला. त्यातच रात्री उशिरापर्यंत स्पीकरवरच आपला प्रबोधनात्मक आवाज पोहोचविताना गर्दी वाढत गेली आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रदूषण रोखण्यासाठी १० नंतर ध्वनिक्षेपकांवर मर्याद आणली. त्यानंतर आवाजाची स्पर्धा सुरू झाल्याचे रवींद्र माळवदकर सांगतात. हळूहळू कोणाचा आवाज मोठा, हे दाखविण्यासाठी पुण्याच्या बाहेरून डीजे, मिक्सर आणि इतर ध्वनिक्षेपक यंत्रणा येऊन स्पर्धा करू लागल्याने पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले, असेही त्यांनी नमूद केले.
पारंपरिक वादनावर डीजेचे वर्चस्व
पूर्वी उपनगर आणि खेड्यांमध्ये संध्याकाळी शेतातील कामे आटोपल्यानंतर तरुण ढोल-लेझीम, व्यायाम आणि आखाड्यांचा सराव करीत. उरुसांच्या काळात पथकांच्या स्पर्धा होत आणि त्यातून मिळणारी बक्षिसे सार्वजनिक कामांसाठी वापरली जात होती. मात्र, कालानुरूप उपनगरे विस्तारली, तरुणांचे दैनंदिन जीवन बदलले आणि नियमित सराव कमी झाला. लाठी-काठी, दांडपट्टा, ढोल-लेझीम यांसारख्या पारंपरिक कलांची जागा हळूहळू सोप्या आणि झटपट उपलब्ध होणाऱ्या स्पीकरने घेतली. डीजेचा प्रश्न निर्माण होण्यामागे पारंपरिक वादन कमी होणे हे देखील कारण ठरले, असे मत माळवदकर यांनी नोंदवले.
डीजेच्या उगमाचे परिणाम
राज्यभरातून पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी गर्दी करणारे गणेश भक्तांची संख्या आकर्षक देखाव्यांची परंपरा कमी झाल्याने आपसूकच बाहेरील गणेशभक्तांची संख्याही कमी झाली. या सजावटींवर होणाऱ्या खर्चाचा मोठा हिस्सा विसर्जन मिरवणुकीकडे वळला आहे. दहा दिवसांच्या उत्सवापेक्षा एका दिवसाच्या मिरवणुकीचे वर्चस्व वाढल्याने डीजेचा खर्चही वाढत चालला असून, यातून सामाजिक बांधिलकी, दायित्व विसरून गेल्याची खंत अनेक जुने कार्यकर्ते व्यक्त करतात.