पुणे: तीन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्रातील घाटांसह बांधीव हौद, लोखंडी टाक्या, मूर्तिसंकलन केंद्रे, निर्माल्य कलश, फिरती स्वच्छतागृहे आणि स्वच्छतेची यंत्रणा उभारण्यात आली आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी शुक्रवारी विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील विसर्जन घाटांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
गणेशोत्सवासाठी पुण्यातील वातावरण भक्तिमय झाले असून, गणेशोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक शहरात येतात. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून तयारी करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून उत्सव काळात आवश्यकतेनुसार फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नदीपात्रातील घाटांवर बांधीव हौद, लोखंडी टाक्या आणि निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील पाच तलाव, सात विहिरी आणि कालव्यालगतही गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि दान केंद्रेही उभारण्यात येणार आहेत.
गणेश मंडळांचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश
उत्सवकाळात रस्ते, मोकळ्या जागा, कचराकुंड्या, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौद तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मुख्य रस्त्यांवरील खड्डेदुरुस्ती, सुलभ शौचालये, अतिरिक्त प्रकाशव्यवस्था, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, सीसीटीव्ही सनियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
१५ घाटांवर २४ तास सुरक्षा
गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन अग्निशमन विभागाकडून शहरातील १५ प्रमुख घाटांवर २४ तास सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. अमृतेश्वर, पुलाची वाडी, नटराज सिनेमा, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान येरवडा, दत्तवाडी आणि वारजे स्मशानभूमी घाटांचा यात समावेश आहे.
९० जीवरक्षक; ३० जण राखीव
प्रत्येक घाटावर फायरमनसह जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तीन पाळ्यांमध्ये ९० जीवरक्षक कार्यरत राहणार असून, मध्यवर्ती अग्निशमन केंद्रात ३० जीवरक्षक राखीव ठेवले जाणार आहेत. घाटांवर अतिरिक्त दोरखंड आणि लाइफ जॅकेटही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नागरिकांनी नदीपात्रात न जाता महापालिकेच्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
'विद्युत खांबांना हात लावू नका'
गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेबाबत महापालिकेने नागरिक आणि गणेश मंडळांना सतर्क केले आहे. पथदिव्यांचे खांब, फीडर पिलर यांना स्पर्श करू नये, अनधिकृत वीजजोडणी घेऊ नये तसेच खांबांना केबल किंवा तारा बांधू नयेत. धोकादायक पोल, तुटलेला जंक्शन बॉक्स किंवा उघडी भूमिगत केबल आढळल्यास तातडीने क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घेऊन विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर यांनी सांगितले.
उत्सवकाळात अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या रजा बंद
गणेश विसर्जनाच्या काळात अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहावे, यासाठी १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत.