पुणे: उन्हाचा चटका कायम असल्याने कलिंगड, खरबूज, द्राक्षे आदी रसदार फळांकडे कल कायम आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे.
उन्हाळी बहरातील डाळिंब बाजारात दाखल होत आहे. यामध्ये पांढरे तसेच गुलाबी दाण्यांच्या डाळिंबांची आवक जास्त असल्याने त्याच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या भावात पंधरा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे.
लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकरीवर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. बाजारात येत असलेल्या जवळपास सत्तर टक्के लिबांमध्ये अपेक्षित रस नसून ती कच्ची असल्याचे चित्र आहे. मात्र, आवक- जावक कायम असल्याने त्यांचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले. मृग बहरातील संत्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने अहिल्यानगर येथून होणारी आवक घटली आहे.
फळबाजारात मोसंबीची 30 ते 35 टन, संत्रा 1 ते 2 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबाची सुमारे 1000 ते 1200 गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबूज 5 ते 6 टेम्पो, चिकू 2 हजार गोणी, पेरू 100 ते 150 क्रेट, अननस 6 ट्रक आणि हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेटी, तर कर्नाटकातून 10 हजारांहून अधिक पेट्यांची आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 500 ते 2000, मोसंबी : (3 डझन) : 280-420, (4 डझन) : 160-240, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-180, आरक्ता : 10-40, गणेश : 5-25, कलिंगड : 5- 16, खरबूज : 10-30, पपई : 5-15, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 250-500, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 400-1200, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (कच्चा) : 1200-3500, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (तयार) : 1700 ते 4000, कर्नाटक : हापूस (3 ते 5 डझन) 1000-1500, पायरी (4 डझन) 600-900, लालबाग (1 किलो) 30-40.