पुणे: शहरातील पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असताना महापालिकेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून विकसितकेलेले फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेकडून विशेष ‘फुटपाथ क्लिनिंग पथक’ स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातून शहरातील पदपथावरील टपऱ्या, फेरीवाले आणि इतर अतिक्रमणांवर थेट कारवाई केली जाणार आहे. पुढील तीन दिवसांत सर्वेक्षण करून शक्य तेवढी अतिक्रमणे हटविण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
शहरातील पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पदपथांची दुरुस्ती, स्वच्छता आणि बेकायदेशीर अतिक्रमणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालिकेने तब्बल 110 कोटी रुपयांचे भरीव बजेट मंजूर केले आहे. पदपथांना अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी विशेष ‘पदपथ स्वच्छता पथका’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पदपथांवरील बेकायदेशीर टपऱ्या, अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे रोखण्यासाठी हे पथक चोख कामगिरी बजावणार आहे. या विशेष पथकात पोलिस कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा संयुक्त समावेश असेल. या पथकाला पालिकेकडून स्वतंत्र वाहने दिली जाणार असून, त्यांना अत्याधुनिक कॅमेरे दिले जाणार आहेत. याद्वारे पदपथांवरील बेकायदेशीर हालचालींवर थेट वॉच ठेवला जाईल, असे राम म्हणाले.
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, पहिल्या टप्प्यात हे विशेष पथक शहरातील मध्यवर्ती भागातील (सेंट्रल सिटी) सर्व प्रमुख पदपथांचे सविस्तर सर्वेक्षण करेल. पदपथांची नेमकी दुरवस्था काय आहे, कुठे बेकायदेशीर टपऱ्या आहेत आणि कुठे दुरुस्तीची गरज आहे, याचा सविस्तर अहवाल हे पथक प्रशासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे तत्काळ अतिक्रमण हटाव आणि दुरुस्तीची प्रत्यक्ष कारवाई केली जाईल.
पादचाऱ्यांना मिळणार दिलासा
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील पदपथांवर अनधिकृत व्यावसायिक, टपऱ्या आणि वाहनांनी ताबा मिळवल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे आणि पोलिसांच्या थेट सहभागामुळे पुण्याचे पदपथ मोकळा श्वास घेतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.