पुणे: उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मावळ तालुक्यातील एका ठिकाणी भेसळयुक्त आंबा पल्प तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 2 लाख 23 हजार 196 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संबंधित उत्पादन युनिटवर छापा टाकला. तपासणीदरम्यान आंबा पल्प तयार करताना अधिकृत नसलेले रंग व इतर भेसळीचे घटक वापरले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून आंबा पल्प, आंबा फळ तसेच साखर, गायीचे दूध आणि द्रव केशरी रंग अशा घटकांसह एकूण सहा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या ठिकाणी साठवून ठेवलेला 3,282.9 किलो इतका 1 कोटी 61 लाख 816 किंमतीचा माल जप्त केला. नाशवंत स्वरूप लक्षात घेऊन हा साठा नष्ट करण्यात आला.
दरम्यान, उत्पादन युनिटकडून खेड तालुक्यातील एका कंपनीला पुरवठा केल्याचेही उघड झाले. त्या ठिकाणी तपासणी करताना आंबा पल्पचा एक नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला, तसेच 558 किलो साठा जप्त करण्यात आला. परवाना नसताना फळ विक्री किंवा ज्यूस उत्पादन करणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्यांतर्गत अशा प्रकरणांमध्ये 10 लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
भेसळयुक्त अन्नाबाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी 1800 222 365 या टोल-फी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त डी. व्ही. भोगावडे यांनी केले. ही संपूर्ण कारवाई अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पार पाडली.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या भेसळीला आजिबात सहन केले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागरिकांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी शंका असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.