

पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यंदाही राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.10 एप्रिलपासून अर्जाचा पहिला भाग https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत पोर्टलवर भरता येणार आहे. तर, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे काही वर्षांपासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. गेल्या वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेवटच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेश मिळत नाही तोपर्यंत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मागील वर्षी पहिले सत्र संपत आले तरीही अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविण्यात आली.
इयत्ता दहावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचे दोन भाग उपलब्ध करून दिले जातात. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते.
त्यामुळे 10 एप्रिलपासून सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग राज्य मंडळांचा निकाल जाहीर केल्यानंतर उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.