पुणे: कधी कधी संसाराची सुरुवात जशी झपाट्याने होते, तशीच त्याची समाप्तीही वर्षानुवर्षांनी एखाद्या शांत निर्णयात सामावते. लग्नाच्या दोन महिन्यांत तुटलेले नाते तब्बल पाच वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकून राहिले. अखेर कुटुंब न्यायालयाने ‘क्रूरते’च्या कारणावरून पतीच्या बाजूने निकाल देत त्या नात्याला पूर्णविराम दिला.
राजा आणि राणी (नावे बदलली आहेत) यांचा 2021 मध्ये विवाह झाला. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सुरू झालेला हा प्रवास किरकोळ वाद, वाढती दुरावलेली नाती आणि संवादाचा अभाव यामुळे दोन महिन्यांतच खंडित झाला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर दोघांनीही वेगवेगळा मार्ग निवडत आयुष्य सुरू केले.
त्यानंतर पुन्हा एकत्र येण्याचा कोणताही प्रयत्न न होता, हे नाते फक्त कागदोपत्रीच उरले. पाच वर्षांनंतरही परिस्थिती न बदलल्याने अखेर पतीने ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयाचे दार ठोठावले. यावेळी, सहजीवनाचा अत्यल्प कालावधी आणि दीर्घकाळ विभक्त राहणे यावर भर देत घटस्फोट अर्ज मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
सुनावणीदरम्यान पतीच्या बाजूने ॲड. कांबळे यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब एकसंध आणि नैसर्गिक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. साखरपुड्यापासून ते विभक्त होईपर्यंतच्या काळातील घटनाक्रम साक्षीदारांनी स्पष्टपणे मांडला.
मात्र, पत्नी या आरोपांना ठोस पुराव्यांनी आव्हान देऊ शकली नाही. न्यायालयाच्या निरीक्षणात एक महत्त्वाचा मुद्दा ठळकपणे समोर आला की, पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांना कोणताही भक्कम पुरावा तिने सादर केला नाही. उलट, प्रकरणात सुरुवातीपासूनच विलंबाची भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे तिचा दावा आधारहीन असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.