Divorce Pudhari
पुणे

Pune Divorce Trends: पुण्यात घटस्फोट वाढले; कौटुंबिक न्यायालय जोडपींना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न

बदलत्या जीवनशैली, आर्थिक दबाव आणि संवादाचा अभाव हे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण करणारे मुख्य कारण

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढते अनुकरण, आर्थिक अस्थिरता, विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाढलेला कल, एकमेकांना पुरेसा वेळ न देणे आणि वेगवान जीवनशैली यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. पुणे कौटुंबिक न्यायालयात दरवर्षी चार हजारांहून अधिक नवे खटले दाखल होतात. दररोज दहाहून अधिक घटस्फोटाचे दावे येत असल्याचे न्यायालयात दाखल दाव्यांवरून स्पष्ट होत आहे.

पूर्वी घरगुती हिंसाचार घटस्फोटाची प्रमुख कारणे होती. सासरकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ, पैशांची मागणी आदी कारणांमुळे अर्ज दाखल होत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या खटल्यांचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी झाले आहे. सध्या एकत्र राहूनही संवादाचा अभाव, संशयी वृत्ती आणि एकमेकांच्या गरजांकडे दुर्लक्ष ही कारणे पुढे येत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अपेक्षा वाढल्या आहेत. घर, गाडी, ऐशोआराम आणि आर्थिक स्थैर्य यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. या अपेक्षांमुळे वाद निर्माण होत आहेत. उशिरा सुरू होणारे वैवाहिक आयुष्य हेही घटस्फोटामागचे एक कारण ठरत आहे.

पैसा जिंकतोय, फॅमिली हरतेय

सध्या नात्यांमध्येही मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. पैशांपुढे नात्यातील प्रत्येकाला हरविण्याचा प्रयत्न होताना दिसतो. ओळखीतील इतरांकडे जे आहे ते माझ्याकडेही हवे या वृत्तीमुळे पती-पत्नीमध्ये एकमेकांशी तुलना करण्याची सवय वाढत आहे. यामधून नात्यामध्ये तणाव निर्माण होऊन पती-पत्नीच्या नात्यांमधील संबंध ताणले जात आहे.

न्यायालयाचा प्रयत्न ‌‘नातं टिकवण्याचा‌’

कौटुंबिक न्यायालयाचा उद्देश केवळ घटस्फोट देणे नसून, शक्य तितक्या जोडप्यांना पुन्हा एकत्र आणणे हा आहे. प्रत्येक प्रकरणात समुपदेशनाद्वारे पती-पत्नीमध्ये संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी न्यायालय सकारात्मक भूमिका घेत असल्याची माहिती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. कल्पना निकम यांनी दिली.

पती-पत्नींमध्ये सातत्याने संवाद होणे आवश्यक आहे. कामाच्या व्यापातून एकमेकांसाठी वेळ देणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि भावनिक नाते जपणे गरजेचे आहे. ‌‘सेटल‌’ होण्याच्या धावपळीत नात्यांचा अर्थ हरवू नये. गाडी, बंगला आणि पैशांपेक्षा नात्यांना महत्त्व दिल्यास मतभेदांची दरी कमी होऊ शकते. अनेक प्रकरणांमध्ये समुपदेशनानंतर गैरसमज दूर होतात आणि जोडपी पुन्हा एकत्र येतात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे.
ॲड. प्रथमेश भोईटे, उपाध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन
आजच्या पिढीत अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठी दरी दिसते. आर्थिक स्थैर्य, जीवनशैली आणि सामाजिक तुलना यामुळे नात्यांमध्ये तणाव वाढतो. अनेकदा किरकोळ मतभेद वेळेवर सोडवले जात नाहीत आणि तेच पुढे मोठ्या वादाचे रूप घेतात. घटस्फोट हा शेवटचा पर्याय असावा. त्याआधी समुपदेशन, कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि संयम या गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
ॲड. शिवराज निंबाळकर, ऑडिटर, पुणे बार असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT