पुणे: मान्सूनच्या तोंडावर शहरातील जुन्या आणि अतिधोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील राहण्यास अयोग्य आणि अत्यंत जर्जर झालेल्या ३६ मिळकतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तत्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकेने रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.
पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये ऐतिहासिक आणि जुन्या वाड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, योग्य देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक वाड्यांची अवस्था दयनीय आणि जर्जर झाली आहे. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणानुसार बांधकाम विभागाने ३६ अतिधोकादायक इमारतींची यादी निश्चित केली आहे. या वाड्यांवर आणि धोकादायक मिळकतींवर महापालिकेच्या वतीने 'धोकादायक' असे मोठे लाल फलक लावले असून, त्या ठिकाणी सूचनापत्रकेही चिकटविण्यात आली आहेत.
दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही!
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, अतिवृष्टीमध्ये हे वाडे कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २६८ (बी) व (सी) अंतर्गत सर्व संबंधित मालक, भाडेकरू आणि रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याचे कायदेशीर आदेश देण्यात आले आहेत. नोटीस मिळूनही जे नागरिक तेथेच राहतील, ते स्वतःच्या जबाबदारीवर राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दुरुस्तीसाठी 'हे' नियम पाळावेच लागणार
अतिधोकादायक वाड्यांचे पाडकाम करण्याची मोहीम हाती घेतली जात असली तरी ज्या वाड्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या ठिकाणी यूडीसीपीआर कायदा २०२० नुसार काम करावे लागेल. ही दुरुस्ती केवळ परवानाधारक वास्तूविशारद किंवा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनीअर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करणे बंधनकारक आहे.
मध्यवर्ती पेठांमध्ये दर वर्षी धाकधूक!
शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, कसबा आणि रास्ता पेठ या भागांत सर्वाधिक जुने वाडे आहेत. पावसाळ्यात भिंती खचणे, छप्पर कोसळणे अशा घटना दरवर्षी घडतात. म्हणूनच, कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने यंदा आधीच ३६ मिळकती रिकाम्या करण्याची मोहीम तीव्र केली आहे.