PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते अन्‌‍ अतिक्रमणांनी ग्रासलेली मध्यवस्ती

शनिवार पेठ–फुले मंडई प्रभागात पार्किंगसह जुन्याच समस्या कायम

पुढारी वृत्तसेवा

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई प्रभाग (क्र. 25) आजही विविध समस्यांनी ग््राासलेला आहे. यात वाहतूक कोंडी, अरूंद रस्ते, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आदी समस्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील जुन्या समस्या आणि प्रश्न कायम असून, ते सुटणार तरी कधी, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रभागात स्वारगेटच्या अलीकडचा भाग, टिळक रोड, शिवाजी रोड आणि नदीपात्रापासून शनिवारवाड्यापर्यंतच्या भागाचा समावेश आहे. जुने पुणे म्हणून या परिसराची ओळख आहे. या भागाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. पुण्याच्या इतिहासात या भागाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंसह, मंदिरे, जुने वाडे या प्रभागात आहेत.

शहराच्या मुख्य बाजारपेठेचा भाग या प्रभागात असल्याने या ठिकाणी नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी पुणे शहरातील उपनगरे आणि ग््राामीण भागातून नागरिक येत असतात. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होत असून, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता या प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त होत आहे. या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होत गरजेचे असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

मी नगरसेवक असताना शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यांवर 36 इंची व्यासाच्या मोठ्या ड्रेनेजलाइन टाकल्या आहेत. मध्यवस्तीतील लोकांसाठी पीएमपीमार्फत ‌’10 में बस‌’ ही बससेवा सुरू केली. कोरोना काळात प्रभागामध्ये स्व:खर्चाने घरोघरी लस देण्याचा उपक्रम राबवला. तसेच तीन हजारांपेक्षा अधिक किटचे वाटप केले. मिळकतकराची अभययोजना राबवली. वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.
हेमंत रासने, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार

या भागात वाहनांच्या पार्किंगची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. परिसरात अनेक इमारती जुन्या असल्याने रहिवाशांना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही रहिवाशांना आपल्या वाहनांचे नदीपात्रात पार्किंग करावे लागत आहे. पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरात अनेकांची वाहनेसुद्धा वाहून जात आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या प्रभागात महापालिकेच्या चार पार्किंग आहेत. मात्र, रहिवासी आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग््रााहकांच्या संख्येचे तुलनेत ही व्यवस्था खूपच त्रोटक आहे. या भागात अधिकची पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून ती सुविधा मोफत देण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

मी माझ्या कार्यकाळात प्रभागात विविध विकासकामे केली आहे. जुन्या झालेल्या जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाइन बदलून मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकल्या आहेत. वाचनालये देखील उभारली आहेत. कोरोना काळात नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून रहिवाशांच्या विविध समस्या सोडविण्यात येत आहे. नागरिकांसाठी कायदेशीर सल्ला, व्याख्यानमाला, तसेच विविध कार्यशाळा आदी उपक्रम राबविले आहेत.
ॲड. गायत्री खडके, माजी नगरसेविका

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकांनामध्ये माल घेऊन येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्यानेही बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे दुकानांमध्ये माल घेऊन येणाऱ्या वाहनांना दिवसा प्रवेश बंद करावा आणि वर्दळ कमी असताना रात्रीच्या वेळीस त्यांना प्रवेश देणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रभागात या भागांचा समावेश

शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाषनगर, माडीवाले कॉलनी, शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई, नूतन मराठी विद्यालय, सदाशिव पेठ (पार्ट), राजा दिनकर केळकर संग््राहालय, कबीर बाग, अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तुळशीबाग, शनिपार, रेणुका स्वरूप शाळा, भावे हायस्कूल, भरत नाट्य मंदिर, टेलिफोन एक्सचेंज (बाजीराव रोड) आदी.

प्रभागातील रस्तेदुरूस्ती आणि काँक्रिटीकरणाची कामे केली. जुन्या पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजलाइन बदलून नवीन वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यासह गेल्या काळात प्रभागात विविध विकासकामे करण्यावर भर दिला आहे.
राजेश येनपुरे, माजी नगरसेवक

प्रभागातील प्रमुख समस्या

  • मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी

  • अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या समस्येत भर

  • रस्ते आणि पदपथांना अतिक्रमणांचा विळखा

  • अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या गंभीर

  • जुन्या इमारतींमध्ये पार्किंगसाठी जागेचा अभाव

प्रभागात झालेली विकासकामे

  • जुन्या जलवाहिन्या काढून नवीन वाहिन्या टाकल्या

  • काही भागात जीर्ण झालेल्या ड्रेनजलाइन बदलल्या

  • रस्त्यांवरील पथपथांचे सुशोभीकरण

  • पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती

  • अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले

प्रभागात वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमणे आदी समस्या आहेत. रस्त्यांलगत गेल्या अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. महापालिका प्रशासन आणि निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
मनीष जाधव, रहिवासी

रस्ते, पदपथ अतिक्रमणमुक्त होणार कधी?

वाहतूक कोंडी, पार्किंगच्या समस्येसोबतच अतिक्रमणांची समस्या देखील गंभीर आहे. मध्यवस्तीतील काही पादचारी मार्ग तर पथारी व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहेत. पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने परिस्थिती पुन्हा ‌’जैसे थे‌’ होत आहे. प्रभागातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे वाहनांचे पार्किंग कराचे तरी कुठे, असा प्रश्न रहिवाशांसमोर निर्माण होत आहे. पार्किंगचा प्रश्न सुटला तर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे समस्येवर उपाययोजना होणे गरजेचे आहे.
नितीन बोरावके, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT