पुणे: प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपच्या दोन महिला नगरसेविकांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. हा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा थेट पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. नगरसेविका अर्चना पाटील यांनी आपलीच सहकारी नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
शिस्त आणि पक्षनिष्ठा यांच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘टक्केवारी’च्या वादावरून भाजपच्या दोन महिला नेत्यांमध्ये महापालिकेतच खडाजंगी झाली होती, तो वाद मिटत नाही तोच आता नव्या वादळाने पुण्यातील भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 22 मध्ये कार्यरत असलेल्या अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘शीतयुद्ध’ सुरू होते. मात्र, आता या वादाने उग््रा रूप धारण केले आहे. अर्चना पाटील यांनी असा गंभीर आरोप केला आहे की, मृणाल कांबळे यांनी त्यांचे ‘मॉर्फ केलेले’ व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांच्या बैठकीतील विधाने फिरवून ती पाटील यांच्या तोंडी घालण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला वाद : हा वाद केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. नगरसेविका अर्चना पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ‘पक्षांतर्गत अनेकदा तक्रारी करूनही तोडगा निघाला नाही, त्यामुळे आता नाईलाजास्तव पोलिसांत धाव घ्यावी लागली,‘ अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे. या तक्रारीमुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
कांबळेंचा ‘पलटवार’
दुसरीकडे, मृणाल कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘अर्चना पाटील या केवळ प्रसिद्धीसाठी आणि विकासकामांत अडथळा आणण्यासाठी असे स्टंट करत आहेत,’ असा पलटवार कांबळे यांनी केला आहे.
...तर दोघींचीही हकालपट्टी करणार
अर्चना पाटील व मृणाल कांबळे यांच्यातील वाद वाढतच आहे. आता हा वाद विकोपाला गेल्याने शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यात लक्ष घातले आहे. दोघींनी जर वाद मिटवला नाही तर दोघींची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.