नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे निलख येथून वाहत असलेल्या मुळा नदीला अक्षरशः जलपर्णीचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. पाण्यात सेंद्रिय घटक जमा झाल्याने नदीला जलपर्णीने वेढा घातला आहे.
शुद्ध वाहत्या पाण्यात तसेच धरणाच्या पाण्यात कोणत्याही प्रकारची जलपर्णी वाढत नाही; परंतु नदीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णी पोसली जाते. म्हाळुंगेपासून ते पिंपळे निलख परिसरापर्यंत असे अनेक नाले आहेत. त्यातील सांडपाण्यामुळे या जलपर्णीत आणखीनच वाढ होत असून, परिणामी पिंपळे निलख येथील मुळा नदीला जलपर्णीने विळखा घातल्याचे दिसून येत आहे.
पिंपळे निलख परिसरातील अनेक अबालवृद्ध सकाळची दिनचर्येस नदीत पोहण्यापासून सुरुवात करतात; परंतु या जलपर्णीमुळे यात खंड पडत आहे.
तसेच डासांच्या उत्पत्तीतही वाढ होत असून, यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजाराची शक्यता नाकारता येत नाही. म्हाळुंगे, विशाल नगर, जगताप डेअरी, कासपटे वस्ती, वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, औंध या परिसरातही जलपर्णीमुळे डेंग्यूचे रुग्ण तसेच साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे, परंतु या समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
दरम्यान, यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नदीच्या सौंदर्यांवरही विपरित परिणाम होत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने ही जलपर्णी काढून, नदीचे सौंदर्य अबाधित राखावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पिंपळे निलख येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक अंतरावर मुळा नदीमध्ये जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने येथील परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांकडे तक्रार केली आहे.
राजू सावळे, उपाध्यक्ष, मनसे
हेही वाचा