खडकवासला: पश्चिम हवेली तालुक्यासह सिंहगड भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुत्री, वासरे, शेळ्या-मेंढ्या अशा पाळीव जनावरांसह जंगलातील चितळ, डुक्कर अशा प्राण्यांची शिकार बिबटे करत आहेत. त्यामुळे पर्यटकांसह शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सिंहगड वन विभागाने बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सिंहगडसह परिसरात जागोजागी सूचना फलक उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच नागरी वस्त्या, रस्ते अशा ठिकाणी वारंवार बिबट्या येत आहेत, त्या गावात वाड्या-वस्त्यांत वन विभागाने जनजागृती सुरू केली आहे. मंगळवारी (दि. 10) सिंहगड पायथ्याच्या खानापूर येथे जनावरांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. या आधी आंबी, सोनापूर, खामगाव मावळ, गोऱ्हे खुर्द, घेरा सिंहगड, थोपटेवाडी, मालखेड, कल्याण, मोरदरी, खाटपेवाडी, खरमरी आदी ठिकाणी कुत्री, वासरे शेळ्यांवर हल्ला चढवून ठार केले होते.
बिबट्यांच्या दहशतीमुळे रानात जनावरांना घेऊन चारण्यासाठी जाणे तसेच सायंकाळी सहानंतर रस्त्याने एकटे, दुचाकीवरून तसेच पायी चालत येणे धोक्याचे झाले आहे. सिंहगड, पश्चिम हवेलीत दहा ते बारा बिबटे तसेच मादी व बछडे आहेत. आदी ठिकाणच्या मंदिर, जनावरांचे गोठे, नागरी वस्त्या, कंपन्या, फार्म हाऊसमध्ये बिबट्याने शिरून हैदोस घातला. खडकवासला धरण जवळ असल्याने सायंकाळी सात नंतर बिबटे पाणी पिण्यासाठी तसेच शिकारीसाठी सिंहगडच्या जंगलातून बाहेर पडतात.
सुरुंग स्फोटामुळे बिबटे नागरी वस्त्यांत
सध्या वरदाडे, सिंहगड भागात पुणे बाह्यवळण महामार्गाचे काम सुरू आहे. डोंगर, खडक फोडण्यासाठी सुरुंगाचे स्फोट केले जात आहेत. त्यामुळे सिंहगडच्या जंगलातील बिबटे गेल्या तीन चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्यांत येत आहेत, असे सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले.
बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतात काम करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे भातमळणीची कामे रखडली आहेत. सायंकाळनंतर कोणी घराबाहेर पडत नाही. त्यामुळे रात्री होणाऱ्या गावोगावच्या कीर्तन सोहळ्यात भाविकांची संख्या कमी झाली आहे.धनराज जोरी, ग््राामस्थ, मालखेड
अष्टापूर भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करा!
वाघोली : अष्टापूर परिसरातील खोलशेतवस्ती येथील महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामुळे परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास कोतवाल, विशाल कोतवाल यांनी वन विभागाकडे करण्यात आली. लवकरच पिंजरा बसवण्यात येईल. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाचे अधिकारी प्रमोद रासकर यांनी केले आहे.
आंबी (ता. हवेली) येथील शेतकरी म्हणाले, बिबट्यांच्या दहशतीमुळे चार-पाच गुराखी एकत्रितपणे जनावरे घेऊन रानात जात आहेत. सायंकाळी पाच वाजण्याच्या आतच घरी येत आहेत शेतकरी शेतात थांबत नाहीत.शंकरराव निवंगुणे, शेतकरी, आंबी (ता. हवेली)