ओतूर: हरिश्चंद्रगड परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या भिवंडी येथील सात तरुण-तरुणींचा जीव धोक्यात आला असताना ओतूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. खिरेश्वर गाव मार्गे हरिश्चंद्रगडावर ट्रेकसाठी गेलेले चार युवक आणि तीन युवती रस्ता चुकल्याने भरकटले होते. ओतूर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवत त्यांना सुखरूप बाहेर काढले.
ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील सात जण शनिवारी (दि. २७) सकाळी सुमारे १० वाजता हरिश्चंद्रगड ट्रेकसाठी गेले होते. ट्रेक पूर्ण करून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू केला; मात्र डोंगराळ भागातील दाट धुके, रिमझिम पाऊस आणि मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे त्यांचा रस्ता चुकला व ते जंगलात भरकटले.
परिस्थिती गंभीर होत असताना रात्री सुमारे ९ वाजता त्यांनी कसाबसा डायल ११२ वर संपर्क साधत मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत डायल ११२ पथकासह दोन पोलीस अंमलदार आणि दोन होमगार्ड यांना बॅटरी, रेनकोट आणि आवश्यक साहित्यांसह सरकारी वाहनातून घटनास्थळी रवाना केले.
दरम्यान, नेटवर्कचा अभाव आणि खराब हवामानामुळे संपर्कात अडथळे येत होते. अशा परिस्थितीत स्थानिक गावकरी, पोलीस मित्र आणि तंटामुक्ती समितीच्या सदस्यांच्या मदतीने शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्यात आली. अखेर रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास सातही ट्रेकर्स भयभीत अवस्थेत सुखरूप आढळून आले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे खाली आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही संपूर्ण बचावमोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, शुभमकुमार आणि धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप आमणे, पोलिस जवान पवार, राठोड, श्याम जायभाये, होमगार्ड मोमीन, शिंदे, काळे तसेच पोलीस मित्र मारुती मेमाणे, बाळ पंडित आणि गौरव मेमाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून ओतूर पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.