

पुणे: शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाने पाणी येणे, नियोजित वेळेत पाणी न मिळणे तसेच टँकरची गरज भासणे या कारणांमुळे महापालिकेकडे दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या आतापर्यंत १५०० वर पोहोचली आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेने टँकरच्या फेर्यांमध्ये वाढ केली आहे.
महापालिकेच्या स्वतःच्या टँकर बरोबरच खासगी टँकरचीही मदत घेण्यात येत असून, शहरातील विविध भागांना त्यांच्यामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ४०० खासगी टँकर महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रांवरून पाणी घेऊन शहरात पुरवठा करत आहेत.
या टँकरद्वारे दररोज १६०० ते १७०० फेर्या केल्या जात आहेत. महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत टँकरच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध टँकर व्यवस्था आणि मनुष्यबळावर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून, अनेक भागांत टँकर वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
मनमानी दरांवर नियंत्रणासाठी नवी नियमावली
महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रांवरून पाणी घेणारे काही खासगी टँकर चालक अंतर आणि मागणीनुसार १२०० ते ३००० रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या मनमानी दरांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून नवीन नियमावली तयार करण्याचे काम सुरू असून, टँकर दरांचे नियमन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार मोफत टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच टँकरच्या फेर्या वाढविणे, पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करणे आणि खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही विभागाने सांगितले.