नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या मातीमाफियांनी अक्षरशः धुडगूस घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहनांतून मोठ्या प्रमाणावर माती वाहतूक होत असून, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या अवैध वाहतुकीमुळे आदिवासी भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याची तक्रार स्थानिक ग््राामस्थांकडून करण्यात येत आहे.
आदिवासी भागातील सगळी गावे पेसाअंतर्गत असून, ग््राीन झोनमध्ये येतात. पेसा क्षेत्रातील घाटघर, जळवंडी, खडकंबे, उसरण, शिरोली, चावंड, निमगिरी, खांडेचीवाडी, बगाडवाडी, पारगाव, तळेरान, खुबी, करंजाळे, कोपरे, मांडवे आदी गावांमध्ये मशिनच्या साहाय्याने खुलेआम माती उत्खनन सुरू आहे. विशेष म्हणजे, संबंधित ग््राामपंचायतींच्या ग््राामसभेची कोणतीही परवानगी नसताना रात्रीच्या अंधारात चोरट्या मार्गाने ही माती वाहतूक केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याबाबत वारंवार महसूल विभागाला पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने महसूल प्रशासनावर नागरिकांनी तीव नाराजी व्यक्त केली आहे. मातीमाफियांवर अंकुश ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका देखील होत आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा आदिवासी आजी-माजी सरपंच महासंघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष पोपट रावते यांनी दिला आहे.
दरम्यान, महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मातीमाफिया आणि काही अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. आदिवासी भागातील निसर्गसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर हानी होत असलेलीही हानी लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
रस्त्यांची लागली वाट
अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे आधीच जीर्ण अवस्थेत असलेले रस्ते अधिकच खराब झाले असून, स्थानिक नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. काही वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने गंभीर अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे.
आदिवासी भागात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या मातीमाफियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. महसूल प्रशासनातील तलाठी, मंडल अधिकारी किंवा इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.बाळासाहेब सिरसाठ, तहसीलदार, जुन्नर