Narayanagaon Tamasha Pandhari Pudhari
पुणे

Narayanagaon Tamasha Pandhari: नारायणगावच्या तमाशा पंढरीत कोट्यवधींची उलाढाल; हंगामाला जोरदार प्रतिसाद

अवघ्या 15 दिवसांत 9-10 कोटींचा व्यवहार; उडत्या चालींच्या गाण्यांना वाढती मागणी

पुढारी वृत्तसेवा

सुरेश वाणी

नारायणगाव : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ऐतिहासिक तमाशा पंढरीत यंदा मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फडमालकांनी व्यक्त केला. त्यामुळे यंदाचा तमाशा हंगाम अत्यंत उत्साहवर्धक ठरत असून, कलाकार आणि फडमालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राष्ट्रपती पारितोषिकविजेत्या स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या नावाने ओळखली जाणारी ही तमाशा पंढरी यंदाही गजबजलेली आहे. येथे सुमारे 30 ते 32 फडमालकांचे तंबू (राहुट्या) उभारण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर, मालती इनामदार, सुरेखा पुणेकर, तुकाराम खेडकर, काळू बाळू, मंगला बनसोडे आदी नामांकित फडमालकांचा समावेश आहे.

फडमालकांच्या मते, यंदा बहुतेक सर्व तारखा आधीच बुक झाल्या असून, मागणी प्रचंड वाढली आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते; मात्र, यंदा त्याआधीच बहुतांश कार्यक्रम निश्चित झाले होते. त्यामुळे तमाशा व्यवसायाला यंदा चांगले दिवस आले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती परिसरात काही प्रमाणात तमाशा बारीवर परिणाम झाल्याचे काही फडमालकांनी नमूद केले. तरीही इतर भागांमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याने एकूण हंगामावर त्याचा विशेष परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काही भागात परिणाम; तरी एकूण चित्र सकारात्मक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती परिसरात काही प्रमाणात तमाशा बारीवर परिणाम झाल्याचे फडमालकांनी सांगितले. मात्र, इतर भागांत प्रेक्षकांचा ओघ कायम असल्याने एकूण हंगामावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

उडत्या चालींच्या गाण्यांना अधिक मागणी

फडमालकांनी सांगितले की, सध्या प्रेक्षकांची आवड झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक वग (नाट्यप्रधान भाग) किंवा दीर्घ कथानकांपेक्षा उडत्या चालीची, जलदगतीची गाणी आणि नृत्यप्रकारांना अधिक मागणी आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रचना देखील त्यानुसार बदलावी लागत आहे. पूर्वी वगाला खूप महत्त्व असायचे; मात्र, आता त्याला फारशी मागणी उरलेली नाही. प्रेक्षकांना जलद आणि मनोरंजक सादरीकरण हवे असते, असे काही फडमालकांनी स्पष्ट केले.

यंदाचा तमाशा हंगाम अत्यंत चांगला चालला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून, आर्थिकदृष्ट्‌‍याही समाधानकारक परिस्थिती आहे.
मोहित नारायणगावकर आणि किरणकुमार ढवळपुरीकर, फडमालक
गौतमी पाटील यांसारख्या नृत्यांगणाच्या कार्यक्रमांमुळे आमच्या तमाशावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. पारंपरिक तमाशाला आजही तितकीच मागणी आहे.
श्रीरंग सांगवीकर, फडमालक
तमाशामधून समाजप्रबोधनाचे काम अधिक प्रमाणात केले जाते. पाडव्याच्या दिवशी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तमाशा शौकीन तमाशाची बारी ठरवायला आले होते. गावच्या यात्रेची तारीख व फडमालकाकडे शिल्लक असलेली तारीख याचा ताळमेळ बसताना दिसत नव्हता. किरकोळ चार-दोन फडमालक वगळता बहुतांशी फडमालकांच्या सगळ्या तारखा आधीच बुक झाल्या होत्या.
किरण कुमार ढवळपुरीकर, फडमालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT