पुणे: शेतरस्त्याच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणातील मुळशी तालुक्यातील मरगळे कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेसह प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी निकालात नमूद केले आहे. सहा आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन तर उर्वरित आरोपी अवघ्या विशीतील आहेत.
गणेश रामभाऊ मरगळे (वय 23), सुनिल रामभाऊ मरगळे (वय 20), विजय बाबूराव मरगळे, राजू ज्ञानेश्वर मरगळे (वय 19), राजू रामभाऊ मरगळे (वय 20, सर्वजण रा. करंजावणे वस्ती, किरकटवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. भाऊ सामाजी मरगळे (वय 38) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे चुलत भाऊ भगवान मरगळे (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 30 मे 2020 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
भगवान हे मयत भाऊ बरोबर पानशेत येथे राशन आणण्यासाठी दुचाकीवरून चालले होते. गाडी सांडवघर येथे आली असता विजय मरगळे याने गाडी आडवी घालत फिर्यादी व भाऊ यांना गाडीवरून पाडले. त्यानंतर, त्याठिकाणी अन्य दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भाऊ यांवर धारदार शस्त्राने वार केले. तसेच, फिर्यादीसही मारहाण केली. याप्रकाराला घाबरून भगवान यांनी पळ काढला.
पुन्हा आल्यानंतर त्यांना त्यांचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी, त्यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपींना अटक करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात, सरकार पक्षातर्फे सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी बारा साक्षीदार तपासले. यामध्ये, घटनेच्या दिवशी मृताच्या मागे गाडीवर बसलेल्या प्रत्यक्षदर्शी फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सरकारपक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हत्यारांसह कपड्यांवर मृताचे रक्ताचे डाग असल्याचा पुरावा महत्त्वाचा
आरोपींच्या वकीलांतर्फे हा अपघात असल्याचा युक्तिवाद करत बचाव करण्यात आला. त्याविरोधात, ॲड. राजेश कावेडिया यांनी मृतावर झालेले धारदार शस्त्रांचे वार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कोयत्यांसह त्यांच्या कपड्यांवर माणसाच्या रक्ताचे डाग होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेद्वारे त्याची तपासणी केली असता ते मृताच्या रक्ताचे डाग असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह हाही पुरावा महत्त्वाचा ठरल्याचे ॲड. कावेडिया यांनी सांगितले.