पुणे: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पर्यटन निवासस्थानांमध्ये वेळोवेळी दुरुस्ती, नूतनीकरण, नियमित देखभाल, सुरक्षा उपाययोजना आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा सातत्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध सुधारणा सातत्याने राबविण्यात येत आहेत.
महामंडळाच्या पर्यटक निवासगृहांमध्ये पर्यटकांची समाधानकारक उपस्थिती असून, काही नव्या पर्यटन निवासांचेही संचालन सुरू केले आहे. यामध्ये दाजीपूर, नळेश्वर, टिपेश्वर, सह्याद्री, खारेपाटण, खिंडसी आणि नरसी नामदेव येथील पर्यटन निवासांचा समावेश आहे.
एमटीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ मध्ये प्रमुख पर्यटक निवासांची ऑक्युपन्सी पुढीलप्रमाणे आहे, तारकर्ली - ७१ टक्के, गणपतीपुळे - ७४ टक्के, भंडारदरा - ७० टक्के, खारघर - ६० टक्के, अजिंठा - ६० टक्के, शिर्डी - ५४ टक्के, अजिंठा टी पाईंट- ६० टक्के, हरिहरेश्वर- ३५ टक्के, तारकर्ली- ३७ टक्के (दोन वेळा दिली आहे.), ग्रेप पार्क- ४५ टक्के, वेळणेश्वर ४२ टक्के अशी राहिली आहे. मागील वर्षी एमटीडीसीला एकूण ५७.०२ कोटी उत्पन्न मिळाले असून, १२.४७ कोटी निव्वळ नफा झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील सरासरी हॉटेल ऑक्युपन्सी सुमारे ६३ टक्के असताना एमटीडीसीच्या प्रमुख पर्यटक निवासांची कामगिरी त्यापेक्षा चांगली असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
महामंडळाचे उद्दिष्ट केवळ व्यावसायिक नफा मिळविणे नसून, राज्यातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास, नव्या पर्यटनस्थळांचा विकास, दुर्गम भागांमध्ये पर्यटनाला चालना देणे, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. पर्यटक निवासांबाबत सेवा, स्वच्छता, भोजन व्यवस्था आणि कर्मचार्यांच्या वर्तणुकीबाबत करण्यात आलेले उल्लेख कोणत्याही अधिकृत सर्वेक्षण, लेखापरीक्षण किंवा वस्तुनिष्ठ अभ्यासावर आधारित नसून वैयक्तिक स्वरूपाचे असल्याचे एमटीडीसीने स्पष्ट केले आहे.
एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी केवळ फक्त आणि फक्त २०२५-२६ या वर्षाची माहिती दिली आहे. ती पण जिथे अॅक्युपेशी चांगली आहे. त्या ठिकाणची आकडेवारी दिली आहे, त्याचबरोबर या विभागातील अधिकाऱ्यांनी माथेरान, महाबळेश्वर येथील निवासास्थानाबाबत तोंडाला कुलूप लावले आहे. तसेच, हरिहरेश्वर, तारकर्ली, शिर्डी येथील दिलेली अॅक्युपेशी खूप कमी आहे, या भागात वर्षभर पर्यटक येतात. विशेष म्हणजे तारकर्ली निवासस्थानाबाबत दिलेले माहिती दोन वेळा दिली आहे. परिणामी, या विभागाने दिलेली माहिती संशयास्पद आहे.विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच