माळेगाव: माळेगाव (ता. बारामती) परिसरातील निरा डाव्या कालव्यावर असणाऱ्या फाटा क्र. 22 ला अखेर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जलसंपदा विभागाने उन्हाळी आवर्तन सोडले आहे. हे आवर्तन उशिरा सोडल्याने शेतीला अधिकचे पाणी लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निरा डाव्या कालव्याच्या माळेगाव फाटा क्र. 22 वर तब्बल अडीच हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. मात्र, येथील वाढत्या तापमानामुळे विहिरी कोरड्या पडल्या होत्या. पावसाच्या हुलकावणीमुळे या फाट्यावर अवलंबून असणारे शेकडो शेतकरी उन्हाळी आवर्तन सुटण्याची वाट पाहत होते.
मात्र, जलसंपदा विभागाच्या नियोजन अभावामुळे आवर्तन लांबले गेले. परिणामी, शेतातील पिके कोमेजली गेली. मुख्य म्हणजे उसाचे पीक जाळण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे पिके वाचतील की नाही, या द्विधा मनस्थितीने शेतकरी होते.
या पार्श्वभूमीवर आता दोन महिने या फाट्याला आवर्तन सोडले गेले आहे. हेच आवर्तन एक-दीड महिन्यापूर्वी सोडले असते, तर अनेक पिके वाचली असती. तसेच पाण्याचीही बचत झाली असती, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
आता या आवर्तनाने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाळा लांबला तर संकट अधिक गर्द होण्याची भीती प्रवीण वाघमोडे, रूपेश भोसले, सुभाष तावरे, राजेंद्र भोसले, सूर्यकांत मदने आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.