गणेश खळदकर
पुणे: राज्य परीक्षा परिषदेने २८ जूनची रद्द केलेली टीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी आयबीपीएस कंपनीला पत्रव्यवहार केला आहे. परंतु, आयबीपीएस आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यात पूर्वी झालेल्या चर्चेनुसार आयबीपीएस या कंपनीला सर्व माध्यमातून परीक्षा घेण्यावर मर्यादा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ऑनलाइन टीईटीचे भवितव्य धोक्यात आले. तर परीक्षा ऑफलाइन घ्यायची, की ऑनलाइन यावरून राज्य परीक्षा परिषदेतील अधिकारीच संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य परीक्षा परिषद टीईटी परीक्षा ऑनलाइन घ्यावी, यासाठी आयबीपीएस कंपनीकडे २०२३ पासून पाठपुरावा करत आहे. परंतु, आयबीपीएस कंपनीने २०२४ मध्ये राज्य परीक्षा परिषदेला एक मेल करून काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. यामध्ये परीक्षेच्या रचनेबाबत बोलायचे झाल्यास, आयबीपीएसला दिलेल्या तपशिलामध्ये केवळ इंग्रजी, मराठी आणि उर्दू भाषांचाच समावेश होता.
परीक्षेच्या रचनेच्या तपशिलाचे विश्लेषण केल्यानंतर, उर्दू भाषेच्या परीक्षेवर पुनर्विचार करण्याची विनंती केली. कारण आयबीपीएसद्वारे अशी परीक्षा आयोजित करण्याचा कोणताही पूर्व इतिहास नाही. तथापि, परीक्षेची रचना पाहता एकूण ८ भाषांसाठी भाषा चाचण्यांचा समावेश आहे. आयबीपीएसने मराठी, हिंदी आणि इंग्रजी वगळता इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेसाठी भाषा प्रवीणता चाचणी घेतलेली नाही. कृपया याची नोंद घ्यावी आणि प्रादेशिक भाषांशी संबंधित चाचण्या वगळता येतील का, हे आम्हाला कळवावे.
जर हा प्रकल्प आयबीपीएस मार्फत हाताळला जाणार असेल, तर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या धर्तीवर आपल्याला भाषा केवळ मराठी, इंग्रजी आणि उर्दूपुरत्या मर्यादित ठेवाव्या लागतील. आयबीपीएस कोणतीही भाषा प्रावीण्य चाचणी घेणार नाही, असे आयबीपीएसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन घ्यायची असेल, तर पहिला तोडगा हा भाषेवर काढावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणतात, परीक्षा परिषदेचे अधिकारी?
परीक्षा ऑफलाइन होणार, की ऑनलाइन होणार यासंदर्भात परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आत्ताच काहीही सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. परीक्षा परिषदेचे अधिकारी परीक्षा ऑनलादन व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. परंतु, आयबीपीएस कंपनीचा नकारात्मक प्रतिसाद पाहता राज्य परीक्षा परिषदेवर परीक्षा ऑफलाइन घेण्याची वेळ येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.