Maharashtra Sahitya Parishad  Pudhari
पुणे

Maharashtra Sahitya Parishad Election: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी आवश्यक मार्गदर्शक

मतपत्रिकेवर द फुली चिन्ह, ओळखपत्राची झेरॉक्स जोडणी आणि नियम पाळणे गरजेचे, अन्यथा मत रद्द होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना मत देण्यासाठी उमेदवाराच्या नावापुढील चौकटीत X अशी फुली मारण्याचा नियम केला असून, या नव्या नियमामुळे मतदारांमध्ये काहीसा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मतदारांनो, मतपत्रिकेच्या मागील दिलेले नियम नीट वाचा, मगच मतदान करा. पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे असलेल्या चौकटीत द असे फुलीचे चिन्ह कोणत्याही रंगाच्या बॉलपेनने करण्याचे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मतदाराने आपले आधार कार्ड किंवा पॅनकार्ड यापैकी एका ओळखपत्राची स्वस्वाक्षांकित झेरॉक्स प्रत मतपत्रिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. तरच मतपत्रिका ग््रााह्य धरली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून, मसापच्या अंतिम मतदार यादीनुसार पुण्यासह अकरा जिल्ह्यांत मसापचे 16 हजार 607 मतदार आहेत. निवडणुकीसाठी मतपत्रिका स्पीड पोस्टने रवाना झाल्या असून, पुणे विभागात अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यवाह (सात पदे) आणि जिल्हा प्रतिनिधी (तीन पदे) अशा 13 जागांसाठी मतदान करावयाचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रंगांतील तीन मतपत्रिका केल्या आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी सोमवारी (दि. 9) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सहनिवडणूक अधिकारी संजीव खडके आणि गिरीश केमकर या वेळी उपस्थित होते. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी काही नियमावली करण्यात आली आहे. मतपत्रिकेच्या पाठीमागे ही नियमावली नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक मतपत्रिकेवर विशेष क्यूआर कोड, वॉटरमार्क टाकण्यात आला आहे.

निवडणूक मंडळांनी पाठवलेल्या बारकोड आणि पत्ता नमूद असलेल्या पाकिटातूनच पाठवाव्यात. ही मतपत्रिका असलेली पाकिटे नीट चिकटवल्याची खात्री करावी. मतपत्रिकेचे पाकिट उघडे असल्यास मतपत्रिका बाद ठरविण्यात येणार आहे. पाकिटाच्या तळाशी डाव्या कोपऱ्यात असलेल्या चौकटीत मतदाराने आपले नाव, सभासद क्रमांक, पत्ता नमूद करून आपली स्वाक्षरी करावी व टपाल विभागाच्या नियमानुसार पुरेसे तिकीट लावून टपालाने, अथवा स्वत: अथवा आपल्या अधिकृत प्रतिनिधींबरोबर योग्य मुदतीत निवडणूक मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात ही मतपत्रिका पोचवावी. पुरेशी तिकिटे न लावलेली मतपत्रिका स्वीकारली जाणार नाही, मतदारांनी जितकी पदे आहेत तेवढी मते द्यायची आहेत.

मतपत्रिकेवर कोणतीही खाडाखोड अथवा खूण केलेली असल्यास, काही मजकूर लिहिलेला असल्यास तसेच मत नेमके कोणत्या उमेदवाराला दिले, हे स्पष्ट होत नसल्यास ती मतपत्रिका बाद ठरविण्यात येईल, असे ॲड. परदेशी यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT