Farmers Loan Waiver  Pudhari
पुणे

Maharashtra Farm Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ३० जुलैपूर्वी कर्जमाफी, लाभार्थी यादी लवकरच: कृषिमंत्री भरणे

'गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच'; दत्तात्रय भरणेंचा मोठा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तारीख जाहीर केली होती. परंतु, त्याबाबतची संबंधितांची यादी अचूक असली पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही अडचणी येऊ नये म्हणून वेळ लागला आहे. गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी. त्याबाबतची आज लवकरच यादी पाहायला मिळेल आणि ३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे दिली.

येथील कृषी महाविद्यालयात कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न ते पंतप्रधान यांच्यासमोर मांडू शकतात. राजकारणाचा कुठला प्रश्न आहे मला माहिती नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विचारले असता ते म्हणाले, केंद्रातील मंत्र्यांकडून सांगितले गेले आहे की, चर्चेमधून मार्ग काढू. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

मात्र, शंभर टक्‍के लाठीचार्ज होऊ नये, याबद्दल दुमत नाही. मुलांच्या मागण्या आणि इतर गोष्टी आहेत. खासदार शरद पवार कदाचित पंतप्रधान यांना भेटून मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारचा विषय असला तरी माणूस म्हणून आपलासुद्धा आहे. दोघांनी चर्चा करून मार्ग काढावा. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विचारले असता ते म्हणाले, ते त्यांच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. राजकारण न आणता हा विषय सोडविला पाहिजे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी एक कार्यकर्ता आहे. मला जरी काय वाटलं तरी आमच्या मुख्य नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत. बाकीचे नेते सुद्धा आहेत. आपण एखाद्याला नेता मानलं की, त्या नेत्याने निर्णय घ्यायचा आणि तो आम्ही मान्य करायचा असतो, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्वी असलेले अर्थ खाते पुन्हा मिळण्याची मागणी आम्ही केली असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले आहे. त्यावर मुख्यमंत्री हे सकारात्मक असून, त्यासाठी भाजप नेत नाही म्हणालेले नाहीत. त्याबाबत पवार या मुख्यमंत्र्यांना भेटल्या असून, निर्णयाची आम्ही वाट बघतोय.

अजितदादांच्या आठवणीही...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीवर बोलताना भरणे म्हणाले, अजितदादांचा मोबाईल सकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू असायचा आणि इतके वर्ष मी सकाळीच त्यांना फोन करून शुभेच्छा द्यायचो. आज दादा असते तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता तर त्यांनी मला पहिले विचारले असते, पाऊस कसा सुरू आहे रे? अशा आठवणीही त्यांनी जागवल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT