सुनील जगताप
पुणे: आजच्या धावपळीच्या युगात, जिथे तंत्रज्ञानाचा पगडा मोठा आहे, तिथे एक खेळ असा आहे जो संयम, रणनीती आणि विचारांची खोली शिकवतो... तो म्हणजे 'बुद्धिबळ.' अलीकडच्या काळात या बुद्धिबळाच्या पटलावर भारताने ऑलिम्पिकमध्ये नवी भरारी घेतली असून, त्यामध्ये महाराष्ट्राने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
महाराष्ट्राची भूमी, विशेषतः पुणे, नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसारखी शहरे आज बुद्धिबळाच्या प्रतिभावान खेळाडूंचे केंद्र बनत आहेत. पुण्याच्या अन्वी हिंगेसारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची चुणूक दाखवत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. ही केवळ एका खेळाडूची प्रगती नाही, तर त्यामागे वाढत्या महिला खेळाडूंची संख्या आणि 'राईज अप'सारख्या स्पर्धांचा मोलाचा वाटा आहे. भारताच्या इतर खेळांचा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समावेश असला, तरी बुद्धिबळ खेळाची स्वतंत्र ऑलिम्पिक स्पर्धा भरत असल्याने त्यामध्ये भारताची प्रगती उच्चस्तरीय आहे.
देशांतर्गत विचार केल्यास तमिळनाडू राज्य आघाडीवर असून, कर्नाटक राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्य बुद्धिबळाच्या प्रसारात आघाडीवर आहे. अन्वी हिंगेसारखी उदयोन्मुख खेळाडू आज केवळ स्वतःसाठी नव्हे, तर भारताच्या गौरवशाली क्रीडा परंपरेसाठी लढत आहे. त्यांच्या या संघर्षाला आणि प्रतिभेला जर 'ऑलिम्पिक'सारख्या जागतिक व्यासपीठाचे पाठबळ मिळाले, तर भारताचे बुद्धिबळातील भविष्य निश्चितच सुवर्णमयी असणार आहे.
बुद्धिबळाचा हा प्रवास आता केवळ एका खेळापुरता मर्यादित नसून, तो एका मोठ्या ध्येयाचा... ऑलिम्पिक पदकाचा आहे. खेळ, खेळाडू आणि योग्य दृष्टिकोन एकत्र आले, तर बुद्धिबळाच्या पटावर भारत नक्कीच जगाला 'चेकमेट' करेल, यात शंका नाही.
अलीकडच्या काळात बुद्धिबळमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. पुण्यातून अधिकाधिक चांगले बुद्धिबळपटू पुढे येत असून, नऊ वर्षांखालील प्रीतिका नंदी हिने नॅशनल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे. या वर्षी बुद्धिबळ खेळाडू एशियाडमध्ये समावेश झाला असून, तेथे ही आपली कामगिरी उच्च स्तरावर राहील, असा विश्वास आहे.राजेंद्र कोंडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना