लोणावळा : लोणावळा येथे शुक्रवारी सुरू झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीराचा समारोप शनिवारी करण्यात आला. या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेसच्या वतीने तीन ठराव मंजूर करण्यात आले. याशिवाय या शिबिरात सहभागी आजीमाजी आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे नियोजन, लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती आदी विषयांवर विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशात व राज्यात एक प्रामाणिक सर्वधर्म समभाव व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी राज्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांसाठी मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आल्याचे सांगितले. केंद्र सरकार विशेषतः भाजप खोटे बोला, पण रेटून बोला या पद्धतीने जनतेमध्ये एकप्रकारे भ्रम निर्माण करत असून देशात जी खोटारडी व्यवस्था भाजपच्या वतीने स्थापित करण्यात आली आहे. त्यांचे वास्तव्य जनतेसमोर मांडण्याचा निर्णय या शिबिरात घेतला गेला असल्याचेही पटोले यांनी सांगितले.
या शिबिरात प्रदेश काँग्रेसच्या वतीने तीन ठराव करण्यात आले. काँग्रेस सरकार आल्यावर एमएसपी लागू करुन त्यासंदर्भातील तसा कायदा करण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. राहुल गांधींच्या या निर्णयाच्या स्वागताचा पहिला ठराव करण्यात आला. काँग्रेसचे सरकार आल्यावर देशात रोजगार निर्मितीसह शेतीवर आधारित उद्योग निर्मिती केली जाईल. तसेच, बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा दुसरा ठराव करण्यात आला आहे. शिवाय देशात विविध माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केला जातो. जनतेचे प्रश्न मांडणार्यावर हल्ले केले जातात. देशात राज्यात सर्वत्र झुंडशाही आहे. या घटनांच्या निषेधांचा तिसरा ठराव करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी भाजपवर अक्षरशः आगपाखड केली. भाजपच्या केंद्र सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली आहे.
कर्जमाफीची खोटं आश्वासन दिले होते. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण गेले नाही. आंदोलन करणार्या शेतकर्यांवर लाठीहल्ला व आश्रूधुरांची नळकांडे फोडली जात आहे. देशात व राज्यात तानाशाही सुरू आहे. भ्रष्टाचार मुक्तीच्या वल्गना करणार्या भाजपाने भ्रष्टाचार रोखण्याऐवजी त्याला खतपाणी घालण्याचा व प्रोत्साहन देण्याचा नवा फंडा सुरू केला असून विरोधी पक्षांतील भ्रष्टाचारांचे आरोप झालेल्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याचा सपाटा लावला असल्याची टीका नाना पटोले यांनी या वेळी केली.
पटोले, म्हणाले अनेक आमदारांनी या शिबिरात हजेरी लावली आहे. मात्र, त्यांच्या मतदार संघातील पूर्व नियोजित कार्यक्रमांना जाण्यासाठी त्यांनी आमच्या परवानगी घेतल्या आहेत. तर, काहींनी यापूर्वीच त्यांच्या महत्वाच्या वैयक्तिक कामांच्या कारणांमुळे उपस्थित न राहण्या संदर्भात कळविले होते. मात्र, ज्या सात आमदारांनी याबाबत कोणतीही कल्पना न देता आले नाही. त्यांना नोटीस पाठविली आहे.
हेही वाचा