खडकवासला: धामण ओहोळ-पोळे-दापसरे घाटमाथा तसेच पानशेत धरण परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पानशेत धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने सकाळी ११ वाजल्यापासून धरणाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून ६०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, खडकवासला धरणातूनही सकाळी साडेसातपासून पुन्हा मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता २६.२६ टीएमसी म्हणजेच ९०.०९ टक्के पाणीसाठा झाला होता. पानशेत धरणात ९५, तर वरसगाव धरणात ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत धरण साखळीत ०.७० टीएमसीची भर पडली आहे. रविवारी (दि. २६) धरणसाखळीत २५.५४ टीएमसी (८७.६३ टक्के) पाणी होते. सोमवारी दिवसभरात टेमघर येथे १५ ,पानशेत येथे २२, वरसगाव येथे १५ आणि खडकवासला येथे ८ मिलीमीटर पाऊस पडला.
पाण्याची आवक कमी झाल्याने रविवारी रात्री अकरा वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, सोमवारी पहाटेपासून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढल्याने सकाळीपासून नदीपात्रात पुन्हा २१४० क्सुसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पानशेत धरणातील पाण्याची भर, तसेच पावसाचे प्रमाण वाढल्याने दुपारी एकनंतर खडकवासला धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग ४७०८ क्सुसेकपर्यंत वाढविल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
खडकवासला धरणानंतर पानशेत धरणही १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास खडकवासलातील विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार असल्याने नदी पात्रालगतच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ऑगस्ट महिन्यात धरणे पूर्ण भरणार
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडणार, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता. त्यामुळे जून महिन्यात पुणे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे १५ जूनपासून पुणे शहरात पाणीकपात सुरू झाली. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. खडकवासला प्रकल्पात यंदा २९ व ३० जून रोजी सर्वात कमी ३.६३ टीएमसी पाणीसाठा होता. एक जुलै रोजी ३.६७ टीएमसी (१२.५९ टक्के) पाणीसाठा होता. त्याच दिवशी सह्याद्रीच्या घाट माथ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पर्जन्यवृष्टी सुरू झाली. आठवडाभर जोरदार पाऊस झाल्याने आठ जुलै रोजी प्रकल्पात १४.९५ टीएमसी (५१.३० टक्के ) पाणीसाठा झाला. ८ जुलैला खडकवासला शंभर टक्के भरल्याने जवळपास दीड टीएमसी पाणी मुठा नदीत सोडावे लागले. त्यानंतर आता पुन्हा जोरदार पाऊस सुरू असून, ऑगस्टमध्ये धरणे पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
पुण्याची तहान भागली!
पुणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या खडकवासला साखळी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून २६.२६ टीएमसी अर्थात सुमारे ९०.०९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २६.१४ टीएमसी म्हणजेच ८९.६६ टक्के होता. धरणांतील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे पुणे शहरासह बारामती, इंदापूर, दौंड आणि हवेली तालुक्यांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच, सिंचनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
उजनी धरण ९८ टक्के भरले
उजनी धरणा सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६ वाजता ९७.७९ टक्क पाणीसाठा झाला. सध्या धरणाची पाणीपातळी ४९६.७३० मीटर असून, एकूण पाणीसाठा ११६.०५ टीएमसी झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा ५२.३९ टीएमसी आहे. दौंड येथून ६५०८४ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे. त्यामुळे उजनीचा शंभरीचा पल्ला गाठणार आहे. आता मंगळवार (दि. २८) पर्यंत उजनी १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांसह उद्योगधंदे कारखानदार आणि उजनीवर पिण्याचे पाणी अवलंबून असणाऱ्या सोलापूरसह छोट्या मोठ्या शहरांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उजनी पाणलोटक्षेत्रात पावसामुळे आवक वाढली आहे. त्यानुसार प्रशासनाने सोमवारी सकाळी ११ वाजेपासून विसर्ग वाढवत तो सायंकाळी ७ वाजेपर्यंत २५ हजार क्युसेक केला आहे.
डिंभे धरणात जलसाठा ९२ टक्के
आठवडाभर होत असलेल्या मुसळधार पावसाने हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण झपाट्याने भरू लागले आहे. धरणातील जलसाठा ९२.०१ टक्क्यांवर पोहचला आहे. गतवर्षापेक्षा या वेळी धरण जलदगतीने भरले आहे. डिंभे धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (दि. २७) सकाळी ६ वाजता धरण ९२.०१ टक्के भरले होते. धरणाची पाणीपातळी ७१७.४६ मीटर, एकूण जलसाठा ३५३.८१ दशलक्ष घनमीटर, तर उपयुक्त जलसाठा ३२५.४९ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून ६,८०० क्युसेक आणि वीजगृहातून ५५० क्युसेक असा एकूण ७,३५० क्युसेक विसर्ग घोड नदीपात्रात सुरू आहे.