पुणे: खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात गेले १० दिवस ७०० क्युसेकने विसर्ग सुरू असताना आता जलसंपदा विभागाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दौंड आणि इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी हा विसर्ग आता १ हजार क्युसेकने करण्यात आला आहे. तसेच पालखी सोहळाही इंदापूर तालुका असल्याने वारीसाठी राखीव ठेवण्यात आलेले पाणीच सोडण्यात येत आहे. हे पाणी पिण्यासाठीच देण्यात येत असून इंदापूर तालुक्याला पाणी लवकर पोचावे, असे नियोजन असल्यानेच विसर्गात वाढ केल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
मात्र, मुळात चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबलेला असताना येवाही अत्यल्प आहे. तरीही पाणी सोडण्यात येत असल्याने पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यावर गंडांतर येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य न देता विसर्ग सुरू ठेवल्यावर प्रकाश टाकला. दरम्यान, विसर्ग बंद करण्याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, विसर्ग बंद न करता त्यात आणखी ३०० क्युसेकने वाढ करून तो १ हजार क्युसेक इतका करण्यात आला.
जलसंपदा विभागाचे स्पष्टीकरण
जलसंपदा विभागाने आता स्पष्टीकरण दिले आहे. खडकवासला धरणातील ०.६ टीएमसी पाणी वारीसाठी राखीव ठेवले होते. त्यातील आतापर्यंत ०.३ टीएमसी पाणी सोडले होते. कालव्यातून सोडलेले पाणी दौंड व इंदापूर तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याच वेळी संत तुकाराम महाराज यांची पालखी बारामती व इंदापूर तालुक्यात आहे. त्यामुळे वारकर्यांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी विसर्ग वाढविणे गरजेचा होता, तरच एका दिवसात पाणी इंदापूर तालुक्यात पोचू शकेल.
कमी क्युसेकने विसर्ग सोडल्यास पाणी पोचण्यास उशीर झाला असता. त्यामुळे ३०० क्युसेकने विसर्ग वाढविला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्यासह ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचन देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. त्यामुळे सध्याचे पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडावे लागते. आता पाणी सोडण्यात आल्याने ऑक्टोबरमधील सोडण्यात येणार्या पाण्यावरील ताण कमी होणार असल्याचा दावा विभागाने केला आहे.
२० जुलैनंतर विसर्ग बंद करण्याचा निर्णय होणार
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवार ते मंगळवारदरम्यान पावसाची शक्यता आहे. त्यानुसार खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत १० मिलिमीटर पाऊस झाला तरी मोकळ्या पाणलोटातून दिवसभरात ०.३ टीएमसी पाणी जमा होते. मुळात चारही धरणांच्या पाणलोटात पाऊस झाल्यास सर्वात शेवटी पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडावे लागते. खडकवासला धरणाची साठवण क्षमता २ टीएसी आहे. सध्या धरणात १.६३ टीएमसी अर्थात ८२.७६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस येणार हे गृहित धरून ऐनवेळी विसर्ग वाढवून पूरस्थिती निर्माण होण्याऐवजी कालव्यातून विसर्ग सुरू असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. मात्र, २० जुलैनंतर पाऊस न आल्यास हा विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या विसर्गामुळे शहराच्या पाण्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.