खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, मोसे, मुठा, सिंहगड खोऱ्यात पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील चार धरणसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला साखळीत २.८० टीएमसीची भर पडली आहे. खडकवासला प्रकल्पास सोमवारी सायंकाळी ५ वाजता ८.३२ टीएमसी इतका (२८.५५ टक्के) पाणीसाठा झाला होता.
टेमघर येथे रविवारी (दि. ५) सकाळी सहा ते सोमवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ३५ तासांत उच्चांकी ३८० मिलिमीटर पाऊस पडला, तर पानशेत येथे १९२, वरसगाव येथे १८९ व खडकवासला येथे ८३ मिलिमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह चारही धरणक्षेत्रात रविवारी रात्री दहा वाजल्यापासून पावसाचे थैमान सुरू आहे. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
तव, धामण, ओहोळ, दापसरे, टेकपोळे, माणगाव शिरकोली मुठा, आंबी, मालखेड, वरदाडे, सोनापूर, जांभली, सांगरुण, मांडवी आदी ठिकाणी ओढ्यांना पूर आले आहेत. त्यामुळे चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. खडकवासला व टेमघर धरणात गेल्या २४ तासांत दुपटीहून अधिक पाण्याची वाढ झाली.
घाटमाथ्यासह सर्व धरणक्षेत्रांत सोमवारी सायंकाळी सहापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी दिवसभरात पानशेत व वरसगाव येथे प्रत्येकी ७७, टेमघर येथे १६५ व खडकवासला येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडला. गतवर्षी ६ जुलै २०२५ रोजी धरणसाखळीत १८.३५ टीएमसी म्हणजे ६२.९५ टक्के साठा साखळीत होता.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पावसाच्या वाढत्या जोरामुळे प्रशासनाने धरणक्षेत्र, नदीकाठच्या शेतकरी आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खडकवासला धरण जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले की, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने मंगळवारपर्यंत खडकवासला धरणात ८० टक्क्यांहून अधिक साठा होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून मुठा नदीत पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये.