लेण्याद्री: जुन्नर येथील आदिवासी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहणारे तीन अल्पवयीन विद्यार्थी गेल्या १९ दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञाताने फूस लावून विद्यार्थ्यांना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा अद्याप शोध न लागल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, संतप्त पालकांनी वसतिगृह चालकाला घेराव घालत जाब विचारला.
बेपत्ता विद्यार्थ्यांमध्ये ओंकार नामदेव माळी (वय १६, रा. कोपरे), सौरव दत्तू डामसे (वय १५, रा. कोपरे) आणि ज्ञानेश्वर बुधा दाभाडे (वय १४, रा. मांडवे) यांचा समावेश आहे. तिघेही विद्यार्थी आदिवासी समाजातील असून जुन्नर येथील संबंधित शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत. ओंकार माळी याचे वडील नामदेव पांडुरंग माळी यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
ओंकार हा २९ व ३० ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या रजेवर घरी गेला होता. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी तो नेहमीप्रमाणे कोपरे येथून बसने जुन्नरला शाळेत गेला; मात्र, १ सप्टेंबर रोजी ओंकार, सौरव आणि ज्ञानेश्वर हे तिघेही विद्यार्थी सकाळपासून वसतिगृहात किंवा शाळेत दिसून आले नसल्याचे वसतिगृह प्रशासनाकडून पालकांना कळविण्यात आले. यानंतर पालकांनी जुन्नर शहरासह आजूबाजूचा परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र, तिन्ही विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पालकांचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थी बेपत्ता होऊन १९ दिवस उलटूनही शोध लागला नसल्याने पालकांचा संताप वाढला आहे. पालकांनी वसतिगृहचालकाला घेराव घालत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारला. आमची मुले आम्हाला द्या, असा आक्रोश करत पालकांनी तातडीने विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. पुढील दोन दिवसांत विद्यार्थ्यांचा शोध लागला नाही, तर कोपरे-मांडवे परिसरातील आदिवासी बांधव जुन्नर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करतील, असा इशारा पालकांनी दिला आहे.