बेल्हे : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या मिळत असलेल्या भावाचा विचार करत उत्पादनाचा खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, बांगरवाडी, बोरी बुद्रुक, निमगाव सावा, साकोरी, मंगरूळ, उंचखडक, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पठार भागातही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. यंदा उत्पादन चांगले झाले मात्र सध्या कवडीमोल भावात विक्री होत आहे. या परिसरातील कांदा आळेफाटा,
ओतूर, जुन्नर, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकला जातो. बाजार भाव कमी मिळत असल्याने भांडवली खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीचा कांदा दहा ते पंधरा रुपये किलोने विकला जात आहे. दोन नंबर प्रतीचा कांदा पाच ते दहा रुपये दराने विक्री होत आहे.
कांदा उत्पादनाचा खर्च वाढला आहे. खते,औषधे,फवारणीमुळे मशागत खर्च भरमसाठ झाला आहे. मजुरी वाढल्यामुळे कांदा पीकासाठी एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. मात्र, तो देखील वसुल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, असे कांदा उत्पादक संदीप औटी यांनी सांगितले.