Rice Pudhari
पुणे

India Rice Production: तांदूळ उत्पादनाला यंदा मोठा फटका; ७० लाख टनांची घट होण्याची शक्यता!

लागवड क्षेत्र १४.३६ लाख हेक्टरने घटले; उत्पादन १,४७० लाख टनांवर येण्याचा अंदाज, तरी जागतिक बाजारात भारताचा दबदबा कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अपुरा पाऊस आणि खरीप हंगामातील तांदळाच्या लागवड क्षेत्रात झालेली घट, याचा मोठा फटका यंदाच्या तांदूळ उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. यंदा देशातील तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांची घट होऊन उत्पादन १,४७० लाख टनांवर येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, उत्पादन घटले तरी केंद्राकडे असलेला मोठा तांदूळसाठा आणि देशांतर्गत गरज लक्षात घेता जागतिक तांदूळ बाजारपेठेतील भारताचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात खरीप हंगामात तांदळाच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र ४१२ लाख हेक्टर आहे. गतवर्षी विक्रमी ४२८.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड झाली होती. यंदा मात्र हे क्षेत्र ४१४.१० लाख हेक्टर इतके राहिले असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १४.३६ लाख हेक्टरने घट झाली आहे.

कर्नाटकात ३.६१ लाख हेक्टर, तेलंगणात ३.२९ लाख, झारखंडमध्ये १.८२ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, तामिळनाडूत १.२२ लाख, आसाममध्ये १.२१ लाख आणि महाराष्ट्रात १.०२ लाख हेक्टरने तांदळाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. उत्तर प्रदेशात ७० हजार, तर हरियाणात १५ हजार हेक्टरने लागवड कमी झाली आहे. त्यामुळे कर्नाटक, तेलंगण, झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

गतवर्षी विक्रमी उत्पादन

गतवर्षी विक्रमी लागवड क्षेत्र आणि चांगल्या पावसाच्या जोरावर भारताने चीनला मागे टाकत १,५४० लाख टन तांदळाचे उत्पादन घेतले होते. यंदा मात्र हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे तांदूळ पिकाला पाण्याची टंचाई जाणवत असून, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे उत्पादन सुमारे १,४७० लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे.

जागतिक बाजारात भारताचाच दबदबा

उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी भारताच्या तांदूळ निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. ऑगस्टअखेर केंद्र सरकारकडे सुमारे ६३९ लाख टन तांदळाचा साठा उपलब्ध आहे. हा साठा निर्धारित संरक्षित साठ्याच्या तुलनेत सुमारे पाचपटीने अधिक आहे. अन्न सुरक्षा, इथेनॉल तसेच अन्य उपयोगांसाठी देशाला वर्षाला सुमारे ४५० लाख टन तांदळाची गरज भासते. त्यामुळे देशांतर्गत गरज भागवल्यानंतरही निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात तांदूळ उपलब्ध राहणार आहे. यंदा लागवड आणि उत्पादनात घट झाली तरी जागतिक तांदूळ बाजारपेठेतील भारताचा दबदबा कायम राहील, असा अंदाज जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT