Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Water Release: खडकवासला पाण्यासाठी इंदापूरकरांचा संताप; आंदोलनानंतरही 3 जूनलाच आवर्तन

पिके जळाली, विहिरी कोरड्या; तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी फेटाळल्याने जलसंपदा विभागाविरोधात तीव नाराजी

पुढारी वृत्तसेवा

कळस: इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खडकवासला धरणातून तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सिंचन भवन येथे सोमवारी (दि. 25) तीव आंदोलन केले. मात्र, या आंदोलनानंतर देखील जलसंपदा विभागाने इंदापूरकरांच्या तोंडाला पाने पुसत तत्काळ आवर्तन न देता 3 जूनपासून आवर्तन देण्याचे मान्य केले. जलसंपदा विभागाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव नाराजी निर्माण झाली आहे.

खडकवासला कालव्याचे आवर्तन वेळेत न मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील पिके जळून गेली आहेत. विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी, सोमवारी सिंचन भवनासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु, तरीदेखील तब्बल 10 दिवस पुढची 3 जून ही तारीख जलसंपदा विभागाने आवर्तनासाठी निश्चित केल्याने शेतकर्‌‍यांनी संताप व्यक्त केला.

याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, खडकवासला कालव्याचे आवर्तन न मिळाल्यामुळे शेतातील उभी पिके जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये जलसंपदा विभागाने 12 मे रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याने प्रवेश करताच ते बंद झाले होते.

इंदापूरला पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाची भूमिका उदासीन आहे. चालू आवर्तन देण्यासाठी जी कारणे दिली जात आहेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एकीकडे हक्काचे पाणी इंदापूरला देण्यासाठी असमर्थ असणारे जलसंपदा खाते इतरत्र मात्र ‌‘टेल टू हेड‌’ या नियमाला बगल देऊन मनाला वाटेल तेव्हा नियमबाह्य पद्धतीने पाणी सोडून देत आहे. आजच्या धरणे आंदोलनात तालुक्यातील दोन्हीही नेते सामील झाल्याने आजच पाणी सुटेल, ही लाभधारकांना अपेक्षा होती. परंतु, प्रदीर्घ चर्चेनंतर 3 जूनला पाणी सोडू, या निर्णयाने व जळालेल्या पिकांचा पंचनामा करून एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी करूनही त्यावर कोणतीही ठोस भूमिका न मांडल्याने तालुक्यातील खडकवासला लाभक्षेत्रातील लाभधारकांचा भमनिरास झाला.
विजय गावडे, अध्यक्ष, बळीराजा प्रतिष्ठान
गेल्या काही दिवसांपासून खडकवासलाच्या पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पाणी आले नाही. त्यामुळे जळालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.
जनार्दन पांढरमिसे, लाभधारक शेतकरी
खडकवासला कालवा तालुक्यातील सर्व नेत्यांनी पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली. तालुक्यातील नेते व अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर दीड-दोन तासांनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणी 3 जूनला सुटेल. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे.
रमेश खारतोडे, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT