दिगंबर दराडे
पुणे: हिंजवडी परिसरातील रहिवाशांनी मुळा नदीप्रदूषणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग- 48 वरील पुलाच्या बांधकामादरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात टाकलेल्या माती, दगड आणि कचऱ्यामुळे नदीचा प्रवाह अडखळला असून, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हिंजवडीतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून आहेत. मात्र, नदीचा प्रवाह मंदावल्याने पाणी साचून राहते आणि त्यामध्ये प्रदूषक घटक वाढत आहेत. परिणामी, जलपर्णीची वाढ, डासांची पैदास आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या निर्माण होत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल धनकुडे यांनी सांगितले, की पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात टाकलेला ढिगारा नदीपात्रात अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून, पाणी मागे साचत आहे. ‘ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण मुळा नदी हे अनेकांसाठी पिण्याच्या पाण्याचे मुख्य साधन आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी नागरिकांनी सिंचन विभागाकडे तक्रार केली असून, संबंधित ठेकेदाराला ढिगारा हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या देखरेखीखाली साफसफाईचे काम सुरू झाले असले, तरी पूर्णपणे समस्या सुटलेली नाही. काही ठिकाणी उभारलेल्या जलपर्णी अडवणाऱ्या जाळ्यांमुळेही पाण्याचा प्रवाह आणखी संथ झाल्याची तक्रार आहे. गिरीश खेडकर म्हणाले, ‘नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, येत्या काळात पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊन नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.’
महत्त्वाचे मुद्दे
नदीपात्रात ढिगाऱ्यांचा अडथळा : पुलाच्या बांधकामातील माती, दगड व कचरा मुळा नदीत टाकण्यात आला. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडखळला आहे. पाणी साचून राहण्याची समस्या वाढली आहे.
पाणीप्रदूषणाची वाढती भीती : मंदावलेल्या प्रवाहामुळे पाण्यात प्रदूषक घटक वाढत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.
प्रशासनाची कारवाई अपुरी : सिंचन विभागाने ठेकेदाराला ढिगारा हटविण्याचे आदेश दिले. साफसफाई सुरू असली तरी समस्या पूर्ण सुटलेली नाही. तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वाढली आहे.
नदीपात्रात जलपर्णीची वाढ, डासांची पैदास आणि दुर्गंधी निर्माण झाली आहे. याचा परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे बिल्डरांनी आपला राडारोडा नदीत न टाकता दुसरीकडे टाकावा. नदीपात्रात देखील जीवसृष्टी असते. तिची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.सागर अहिवळे, पर्यावरणतज्ज्ञ