

पुणे: शहरातील बेवारस वाहनांच्या बाबतीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना देखील अशा बेवारस वाहनांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, पीटीपी ॲपमध्ये माहिती नोंद होताच 48 तासांच्या आत पोलिस त्या वाहनांवर कारवाई करणार आहेत.
तर दुसरीकडे पोलिसांकडून नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत वाहनमालकाला हे वाहन त्या जागेवरून हटवावे लागणार आहे. अन्यथा, पोलिसांकडून ते वाहन बेवारस घोषित करून जप्त केले जाईल. बुधवार (दि.15) पासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
शहरातील विविध भागांत रस्त्याच्या कडेला अनेक महिन्यांपासून उभी असलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. तसेच, शहराच्या सुशोभीकरणास बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
बेवारस घोषित करून जप्त करणार
या मोहिमेअंतर्गत संशयित बेवारस वाहनांना प्रथम नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस दिल्यानंतर पुढील 48 तासांच्या आत कारवाई सुरू केली जाईल. तसेच, वाहनमालकाने 24 तासांच्या आत वाहन हलवले नाही, तर ते वाहन ‘बेवारस’ घोषित करून जप्त करण्यात येईल.
दंड भरल्याशिवाय वाहन मिळणार नाही
जप्त करण्यात आलेली वाहने महापालिकेच्या माध्यमातून दंड आकारल्यानंतरच परत दिली जाणार आहेत. त्यामुळे वाहनमालकांनी तत्काळ आपली वाहने हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.